वांद्र्यात उभे राहणार देशातील सर्वोत्तम वसतिगृह: अजित पवार यांची मुंबईत घोषणा

94
मुंबईत वरळी परिसरात जागतिकस्तरावरील पर्यटन प्रकल्प, मराठी भवन, जीएसटी भवन उभे राहत आहेत. त्याचप्रमाणे बांद्रा येथे देशातील सर्वोत्तम असे वसतिगृह उभे करण्यात येईल. ज्यामध्ये सारथी, महाज्योती आणि राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्तरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याची घोषणा राज्याचे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  केली आहे.
मुंबईच्या बेस्टचा जागतिक स्तरावर बोलबाला
बेस्टच्या कुलाबा आगारात पार पडलेल्या “नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड” – एनसीएमसीचे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, देशाच्या आर्थिक राजधानीत सार्वजनिक परिवहन व्यवस्थेसाठी अशी महत्वपूर्ण आणि चांगली सुविधा सुरू होते आहे, याचा विशेष आनंद आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून मुंबई मिळवली आहे. या मुंबईचे मुंबईपण टीकवून, येथील मराठीपण जपत मुंबईकरांच्या श्रमाला मोल मिळालं पाहिजे, त्यांच्या कष्टानेच फळ मिळाले पाहिजे या दृष्टीने विकास केला जात आहे. मुंबईने घोडागाडी ते मेट्रो पर्यंतचा प्रवास पाहिला आहे. मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री या दोघांनीही या शहराच्या विकासासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे. ज्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे, अशा तरूणांनी लक्ष घातले तर काय होऊ शकते, हे मुंबईकर अनुभवत आहेत. मुंबईत रस्ते, मेट्रो, उड्डाण पुल अशी विविध विकास कामे, प्रकल्प सुरु आहेत. मुंबईच्या बेस्ट सेवाचा जागतिक स्तरावर उल्लेख केला जातो. या नव्या सुविधेमुळे नागरिकांना चांगली सुविधा मिळणार आहे.

बेस्टच्या ताफ्यात दहा हजार बसेस 

मुंबईतील नागरिक आणि येथे येणाऱ्या पर्यटकांना उत्कृष्ट सुविधा आणि सेवा देण्याचा प्रयत्न आहे. यासाठी बेस्टच्या ताफ्यात ई -बसेसची संख्या वाढवण्यात येत आहे. येत्या काही वर्षात बेस्टच्या ताफ्यात दहा हजार बसेस असतील. त्यामध्ये डबल डेकर बसेसचाही समावेश असेल. मुंबईत मेट्रोच्या जाळ्याचा विकास करत आहोत. पण रस्तेमार्गांनी जास्तीत जास्त नागरिकांना सेवा देण्याचा प्रयत्न आहे. मोफत आणि दर्जेदार शिक्षणासोबतच महापालिकेच्या शाळांतील मुलांना मोफत बस सेवा देणारी बेस्ट हा एकमेव असल्याचे सांगत पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी बेस्टच्या कामाचे कौतुक केले.
लंडनच्या महापौरांनीही केलेय बेस्टचे कौतुक
कोरोनाच्या काळातही बेस्ट धावत होती. जगातील सर्वात स्वस्त आणि मस्त असा बेस्टचा लौकीक आहे. कमीत कमी तिकीट दरात, उत्कृष्ट बस सेवा देणारी आपली बेस्टच आहे. बेस्ट हा उपक्रम नावाप्रमाणे बेस्ट आहे. परिवहन आणि वीजेचा पुरवठा ही सर्व कामे बेस्ट उत्कृष्टरित्या करत आहे. सात लाख वीज ग्राहकांना ई-बिल्स दिली जात आहेत. शहरातील ४५० मार्गांवर बेस्ट धावते, हे कौतुकास्पद आहे. त्याबाबत लंडनच्या महापौरांनीही कौतुक केले आहे. हरित थांबे, सौर ऊर्जा छतांचे थांबे असे मेड इन मुंबई असे उपक्रम आम्ही राबवत आहोत. मुंबईतील नागरिक आणि येथे येणाऱ्या पर्यटकांना उत्कृष्ट सुविधा आणि सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.