जोशीमठमधील जमीन अवघ्या 12 दिवसांत 5.4 सेंटीमीटरपर्यंत खचली

93

उत्तराखंडच्या जोशीमठ परिसरातील जमीन अवघ्या 12 दिवसांत 5.4 सेंटीमीटरपर्यंत खचल्याचे सॅटेलाइट इमेजमधून दिसून आले आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरने (एनएसआरसी) या इमेजेस प्रसिद्ध केल्या आहेत. यावरून जोशीमठमध्ये जमीन खचण्याची प्रक्रिया कशी सुरू आहे, याचा अंदाज येतो आहे.

महिनाभरात वेगाने भूस्खलन होण्यास सुरुवात

इस्रोने म्हटले आहे की, 27 डिसेंबर 2022 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान जोशीमठमध्ये 5.4 सेमी भूस्खलनाची नोंद झाली आहे. त्याआधी एप्रिल ते नोव्हेंबर 2022 दरम्यान जोशीमठमध्ये 9 सेंटीमीटरपर्यंत भूस्खलन झाल्याचे दिसून आले होते. एनएसआरसीने गेल्या आठवड्यात सांगितले की, डिसेंबर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यादरम्यान जोशीमठमध्ये वेगाने भूस्खलन होण्यास सुरुवात झाली आहे.

सॅटेलाइट इमेजमध्ये दिसतेय की, आर्मी हेलिपॅड आणि नरसिंह मंदिरासह मध्य जोशीमठमध्ये सबसिडन्स झोन आहे. जोशीमठ-औली रस्त्यालगत 2,180 मीटर उंचीवर सर्वाधिक भूस्खलन झाले आहे. 2022 मध्ये, एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान, जोशीमठमध्ये 8.9 सेंटीमीटरपर्यंत भूस्खलन झाल्याचे नोंदवण्यात आले होते.

जोशीमठ भूस्खलन क्षेत्र म्हणून घोषित

चमोली जिल्हा प्रशासनाने जोशीमठ हे भूस्खलन क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. गेल्या काही दिवसांत येथील शेकडो घरे आणि इमारतींना भेगा गेल्या आहेत. जोशीमठमधून शेकडो कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. दरम्यान, राज्य सरकारने 1.5 लाख रुपयांचे पॅकेज मदत म्हणून जाहीर केले असून लवकरच राज्य सरकारकडून पुनर्वसन पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे.

दोन हॉटेल पाडण्याचे काम सुरू

दरम्यान जोशीमठमध्ये गुरुवारी दोन हॉटेल पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, खराब हवामानामुळे ते पाडण्याचे काम मध्येच थांबवावे लागले होते. यापूर्वी स्थानिक नागरिक आणि रहिवाशांच्या विरोधामुळे काही दिवस पाडकामाला स्थगिती देण्यात आली होती. जोशीमठमध्ये फक्त ‘मलारी इन’ आणि ‘माउंट व्ह्यू’ ही हॉटेल्स पाडण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

( हेही वाचा: ग्राहकांनो! ‘या’ दोन दिवशी बँका राहणार बंद; कर्मचाऱ्यांनी पुकारला संप )

 Joshimath, Joshimath subsided by 5.4 cm in just 12 days, ISRO, chamoliएनटीपीसी प्रकल्प जबाबदार, मात्र कंपनीने फेटाळले आरोप

जोशीमठमधील भूस्खलनाचे विश्लेषण करण्यासाठी अनेक तज्ज्ञांची पथके तैनात करण्यात आली आहेत. मात्र, या परिस्थितीसाठी स्थानिक लोकांनी एनटीपीसी जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्याच्या कामाला जबाबदार धरले आहे. दुसरीकडे, एनटीपीसीने एक निवेदन जारी करून त्यांचा बोगदा जोशीमठच्या खालून जात नाही, त्यामुळे त्यांचा आणि या परिस्थितीचा काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.