चवदार तळाच्या सत्याग्रहामुळे देशाची दिशा बदलली; CM Devendra Fadnavis यांचे प्रतिपादन
महाड न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन व कोनशीला कार्यक्रमानंतर मुख्य समारोहा प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (CM Devendra Fadnavis) उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते.
20 मार्च 1927 या दिवशी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली चवदार तळे पाणी सत्याग्रहामुळे देशाची दिशा बदलली, अस्पृश्यता म्हणजे समाजात निर्माण झालेली कुनीती अर्थात पाप असल्याचे स्पष्ट करून समतेची क्रांती घडविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह व कायदेशीर पद्धतीने लढा उभारून हे आंदोलन केल्याचे नमूद केले. महाड चवदार तळे सत्याग्रह म्हणजे सांस्कृतिक परिवर्तनाचा विजय आहे. राज्यात न्यायालयीन सुविधा मोठ्या प्रमाणात व्हाव्यात म्हणून मा. भूषण गवई यांनी केलेले काम महत्त्वपूर्ण असून काही वर्षांपूर्वी पर्यंत 100 ते 150 कोटी रुपयांचा यासंदर्भात असणारा निधी आता 1000 कोटी रुपयांवर दिला जात असून यामुळे न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा अधिक गतीने पूर्णत्वास जातील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (CM Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला.
महाड न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन व कोनशीला कार्यक्रमानंतर मुख्य समारोहा प्रसंगी ते उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. स्पर्धात्मक युगामध्ये न्यायालयीन प्रक्रियांची आवश्यक असणारी सुविधा महत्त्वाची व मोलाची असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी नोंदविले. राज्यात नागपूर मुंबई व छत्रपती संभाजीनगर येथे निर्माण करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय स्कूल मधून आवश्यक ती यंत्रणा निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी (CM Devendra Fadnavis) व्यक्त केला. चवदार तळे येथे झालेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील पाणी सत्याग्रहाच्या आंदोलनाने केवळ पाण्याचा प्रश्न सुटला नव्हे तर देशाची दशा व दिशा बदलल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी महाराष्ट्रात न्यायदानाचे काम वेगात सुरू असल्याचे मत व्यक्त करून ऐतिहासिक पार्श्वभूमी असणाऱ्या महाडमध्ये इमारतीचे भूमिपूजन करायला संधी मिळाल्याचे समाधान लाभल्याच्या भावना व्यक्त केल्या.