भांडुप संकुलात का तुंबले पाणी? हे आहे कारण

जुन्या दोन्ही पर्जन्य जलवाहिनी काढून टाकण्यात आल्या आहेत. त्याची पर्यायी व्यवस्था न केल्याने हा प्रकार घडला असावा.

68

तलाव आणि धरणांमधील पाणी शुध्द करुन मुंबईला पुरवठा केल्या जाणाऱ्या भांडुप संकुलात पाणी तुंबल्याने संपूर्ण मुंबईचा पाणीपुरवठा खंडित करावा लागला. आजवर कधीही या संकुलात न तुंबणाऱ्या पाण्याबाबत तर्क-विर्तक काढले जात आहेत. मात्र, यामागे मुख्य कारण आहे ते म्हणजे येथील जुन्या पर्जन्य जलवाहिन्या बंद होणे. संकुलात दुसऱ्या जलशुध्दीकरण केंद्राचे काम करताना येथील दोन पर्जन्य जलवाहिन्या काढून टाकण्यात आल्या असून, त्यामुळे डोंगरावरुन येणारे पाणी पर्जन्य जलवाहिनी अभावी संकुलात शिरले गेल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

पाणीपुरवठा खंडित

भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील गाळणी आणि उदंचन संयंत्रामध्ये पावसाचे पाणी शिरले. या कारणाने तांत्रिक समस्या उद्भवल्याने येथील विद्युत पुरवठा देखील खंडित करावा लागला. परिणामी मुंबईचा पाणीपुरवठा बाधित झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने शहर आणि पश्चिम उपनगरात पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. पूर्व उपनगरांमध्ये देखील अंशतः पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यानंतर या संकुलात शिरलेले पावसाचे पाणी अक्षरशः युद्ध पातळीवर उपसून गाळणी व उदंचन यंत्रणा परिसरामध्ये स्वच्छता करण्यात आली, त्यानंतर दुरुस्ती करण्‍यात आली. आवश्यक ती सर्व तांत्रिक कार्यवाही करुन उदंचन करणारे पंप टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने सुरू करण्‍यात आले आणि रविवारी सायंकाळपासूनच पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.

(हेही वाचाः भांडुप जलशुद्धीकरण यंत्रणा पूर्वपदावर येण्यास सुरुवात! या भागांत होणार पाणीपुरवठा)

म्हणून भरले पाणी

महापालिकेच्या काही जाणकार अभियंता व अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आजवर कधीही भांडुप संकुलात पाणी भरलेले नाही. परंतु हे पाणी का भरले हा संशोधनाचा भाग आहे. काही जाणकारांच्या म्हणण्यानुसार संकुलात डोंगरावरील पाणी येत असल्याने, संकुलाचे बांधकाम करताना ते पाणी वाहून नेण्यासाठी ६ फूट व्यासाच्या दोन पर्जन्य जलवाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. या वाहिनीतून डोंगरावरुन येणारे पाणी संकुलात न शिरता त्या पर्जन्य जलवाहिनीतून विहार तलावात जायचे. परंतु मध्य वैतरणा आणि प्रस्तावित गारगाई धरणातून मिळणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी, संकुलात दुसरे जलशुध्दीकरण केंद्र बांधण्यात आले. या दुसऱ्या जलशुध्दीकरण केंद्राच्या बांधकामामध्ये अस्तित्वात असलेल्या जुन्या दोन्ही पर्जन्य जलवाहिनी काढून टाकण्यात आल्या आहेत. त्याची पर्यायी व्यवस्था न केल्याने हा प्रकार घडला असावा, अशी माहिती मिळत आहे. यापूर्वी डोंगरावरुन वाहून येणारे पाणी रस्त्यावर वाहत जायचे. पण रस्त्यावर जाण्याचा मार्ग न मिळाल्याने पाणी संकुलात शिरल्याचेही बोलले जात आहे.

(हेही वाचाः पावसाचे धुमशान! मध्य रेल्वे विस्कळीत! सखल भागात साचले पाणी! कोकण रेल्वे ठप्प!)

दरम्यान, महापालिका जलअभियंता विभागाच्या सर्व अभियंता व कर्मचाऱ्यांनी युध्दपातळीवर काम करुन मुंबईकरांचा पाणीपुरवठा सुरळीत केला. त्यामुळे उपजल अभियंता प्रभाकर शिंदे यांच्या सर्व टिमचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांनी कौतुक केले. तसेच येथील परिस्थितीचा आढावा घेतला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.