शेतक-यांपेक्षा व्यापारी करतात अधिक आत्महत्या! जाणून घ्या आकडेवारी

80

शेतकर्‍यांपेक्षा अधिक व्यापारी जीव देतात, असे देशात कधीच घडले नव्हते. पण कोरोनाच्या काळात हेच घडले. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या अहवालात ही बाब समोर आली आहे. अहवालानुसार २०२० मध्ये व्यापाऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपेक्षा अधिक व्यापाऱ्यांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या ताज्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये १० हजार ६७७ शेतकऱ्यांच्या तुलनेत ११ हजार ७१६ व्यापाऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. आत्महत्येची नोंद करताना एनसीआरबी व्यावसायिक समुदायाचे तीन श्रेणींमध्ये वर्गीकरण करते. त्यापैकी ४ हजार ३५६ व्यापारी आणि ४ हजार २२६ दुकानदार होते. तर, उर्वरित इतर श्रेणीत ठेवण्यात आले.

अशी टक्केवारी वाढ

२०१९ च्या तुलनेत, २०२० मध्ये व्यापारी समुदायाच्या लोकांच्या आत्महत्या २९ टक्क्यांनी वाढल्या आहेत. दरम्यान, २०१९ मध्ये २ हजार ९०६ या आकडेवारीच्या तुलनेत २०२० मध्ये व्यापाऱ्यांच्या आत्महत्या दुपटीने वाढल्या आहेत. हे प्रमाण २०१९ च्या तुलनेत जवळपास ४९.९ टक्क्यांनी अधिक आहे. दरम्यान, देशातील एकूण आत्महत्येचा आकडा १० टक्क्यांनी वाढून १ लाख ५३ हजार ५२ वर पोहोचला आहे, जो आतापर्यंतचा सर्वाधिक आहे.

(हेही वाचा : एसटीचा संप : खासगी ट्रॅव्हल्सकडून लूटमार! तिकीट दर ऐकून व्हाल थक्क)

यापूर्वी कधीच घडले नाही

पारंपरिकपणे, व्यावसायिक समुदायांच्या आत्महत्येचे प्रमाण नेहमीच शेतकऱ्यांच्या तुलनेत कमी असते. मात्र कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. व्यवसाय बंद असूनही त्यांना कर भरावा लागला. त्यामुळे त्यांच्यावर दुहेरी आर्थिक दबाव होता. त्यामुळे या वर्गातील लोकांना मोठ्या प्रमाणात आत्महत्या करावी लागली.

लहान व्यवसायाला मोठा फटका

अनिल भारद्वाज, महासचिव, फेडरेशन ऑफ इंडियन मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्रायझेस म्हणाले, “कोविड वर्षात लहान व्यवसायांवर वाईट परिणाम झाला आहे. आतापर्यंत असे मानले जात होते की पीक, नापीक आणि वाढत्या कर्जामुळे अधिक शेतकरी आत्महत्या करतात. परंतु आत्महत्येची आकडेवारी दर्शवते की व्यापारी तणावग्रस्त आहेत आणि साथीच्या रोगाने त्यांच्या तणावात भर घातली आहे.”

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो अहवाल

  • २०१६ मध्ये ८ हजार ५७३ व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या, तर २०१७ मध्ये ७ हजार ७७८, २०१८ मध्ये ७ हजार ९९०, २०१९ मध्ये ९ हजार ५२ आणि २०२० मध्ये ११ हजार ७१६ व्यापाऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.
  • २०१६ मध्ये ११ हजार ३७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तर २०१७ मध्ये १० हजार ६५५, २०१८ मध्ये १० हजार ३४९, २०१९ मध्ये १० हजार २८१ आणि २०२० मध्ये १० हजार ६७७ शेतकऱ्यांनी जीव दिला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.