बोर्डाच्या परीक्षेत यंदाही पेपरफुटी! कोणाला झाली अटक? वाचा

128

दरवर्षी दहावी-बारावीचे पेपर सुरू असताना, अनेकवेळा पेपरफुटीची प्रकरणे घडतात. अलिकडेच राज्यात म्हाडा, टीईटी नोकर भरती परीक्षांचे पेपर फुटल्यानंतर आता यंदाच्या वर्षीही बारावी बोर्डाचा (महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ) पेपर शनिवारी फुटल्याची माहिती उघड झाली. या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथून मुकेश यादव या खाजगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला अटक केली आहे. मुकेशने यादवने बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर आपल्या विद्यार्थ्यांना दिल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

( हेही वाचा : ‘डिलिव्हरी बाॅइज’ संबंधित पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय, आता )

शिक्षकाला अटक

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर झाला होता. मात्र, परीक्षा सुरू होण्याआधीच यादवने हा पेपर त्याच्या तीन विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर पाठवला होता. पोलिसांनी या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांची चौकशी देखील केली आहे. पेपरफुटीसाठी मुकेश यादवसोबत आणखी कोणाच सहभाग आहे का, पेपर मिळवण्यासाठी काही आर्थिक व्यवहार झाला का, याआधीदेखील पेपर फुटलेत का, आदी मुद्यांवरही पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांकडून आता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. फुटलेला रसायनशास्त्राचा पेपर किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला याचीही माहिती पोलीस घेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार फक्त तीन विद्यार्थ्यांना हा पेपर मिळाला आहे. तसेच पोलिसांनी मुकेश यादव या खाजगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला अटक केली आहे.

पेपर फुटला नाही, शिक्षणमंत्र्यांचे सभागृहात निवेदन

दरम्यान, या विषयावर वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत निवेदन सादर करत सभागृहाला या प्रकरणाबाबत माहिती दिली. वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, नियमानुसार सकाळी १०.२० वाजता प्रश्नपत्रिकेचे वाटप झाले होते. विलेपार्ले येथील परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थिनीला उशीर झाला होता. तेव्हा तिचा फोन तपासला असता प्रश्नपत्रिकेचा काही भाग मोबाईलमध्ये १०.२४ वाजता आढळून आला असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे हा संपूर्ण पेपर फुटला असे म्हणता येणार नाही असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

४१ विद्यार्थी कॉपी करताना पकडले

दरम्यान राज्यात नऊ विभागीय मंडळात बारावीची परीक्षा सुरू आहे. आतापर्यंत बारावीच्या ४१ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉपी बहाद्दर सापडल्याने शिक्षण मंडळाने या विद्यार्थ्यांना नापास करण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणी कॉपी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना अटकही करण्यात आली आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रसायनशास्त्र, एमसीव्हीसी पेपर क्रमांक १ मध्ये २७ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले. यामध्ये औरंगाबादमध्ये १५, मुंबईत एक, अमरावती आठ, नाशिक एक, लातूर दोन अशी प्रकरणे आढळून आली. राज्यशास्त्र विषयात १४ कॉपीची प्रकरणे सापडली. अमरावती विभागात सर्वाधिक १२, औरंगाबाद एक, लातूरमध्ये एका प्रकरणाचा समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.