ठाकरे-फडणवीसांची एकत्र एन्ट्री; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

84

शिवसेनेतील फुटीनंतर एकीकडे भाजपा आणि एकनाथ शिंदे समर्थकांकडून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले जात असतानाच, गुरुवारी विधिमंडळात ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनी एकत्र एन्ट्री घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे या दोघांमध्ये हसतमुखाने चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

( हेही वाचा : गुढीपाडव्याला मनसेच्या ‘या’ नेत्यांना मिळाले प्रमोशन; १७ वर्षानंतर पक्षात मोठे फेरबदल )

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातील कामकाजात सहभागी होण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र विधानभवनात दाखल झाले. २०१९ नंतर हे दोघे पहिल्यांदाच असे एकत्र दिसून आल्याने हा चर्चेचा विषय ठरला. दोन्ही नेते एकमेकांसोबत हसतमुखाने संवाद करत विधानभवनात पोहोचले. सभागृहात प्रवेश करेपर्यंत दोघेही एकमेकांशी चर्चा करत होते. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, रवींद्र वायकर यांच्या समवेत उद्धव गट आणि भाजपाचे आमदार उपस्थित होते. त्यामुळे हे नव्या युतीचे संकेत तर नाहीत ना, अशीही चर्चा रंगली.

महाराष्ट्राच्या राजकारणात कमालीची कटुता निर्माण झाली आहे आणि ती संपविण्यासाठी मी पुढाकार घेईन, असे विधान देवेंद्र फडणवीस काही महिन्यांपूर्वी केले होते. त्यावेळी संजय राऊतांनी त्यांच्या या विधानाचे स्वागत केले होते. त्यानंतर आदित्य ठाकरेंनीही एका कार्यक्रमात, ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे संबंध आजही चांगले आहेत. आमच्या मनात कटुता नाही, माझे मन साफ आहे. आमच्या घरात असेच वातावरण आहे. आम्ही पर्सनली काही घेत नाही’, अशी प्रतिक्रिया दिली होती. आदित्य ठाकरेंच्या या प्रतिक्रियेनंतर फडणवसांनी, ‘ठाकरे हे शत्रू नाहीत, तर विरोधक आहेत’, असे विधान केले होते. त्यामुळे ठाकरे आणि फडणवीसांमधील जवळीक पुन्हा वाढू लागल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.