सोलापूर जिल्ह्यातील माळशेज तालुक्यातील बोरगाव, मालेवाडी गावात धक्कादायक प्रकार समोर आला. गावातील ग्रामस्थांनी अंत्यसंस्कारासाठी अंत्ययात्रा काढली. ती अंत्ययात्रा खासगी मालकीच्या जागेतून नेण्यास विरोध केल्यामुळे अखेरीस ग्रामपंचायत कार्यालयासमोरच अंत्यसंस्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पोलिसांचा समजूत काढण्याचा प्रयत्न विफल!
मालेवाडी गावाचे सरपंच दशरथ साठे यांच्या भावाचा काल रात्री मृत्यू झाला. अंत्यविधीसाठी त्यांचा मृतदेह स्मशानभूमीत नेत असताना त्या जागेच्या मालकाने त्याला विरोध केला. स्मशानभूमीत जाण्यासाठी लागणारा रस्ता हा खासगी मालकीचा असल्याने त्यांची अडवणूक करण्यात आली. घटनास्थळी पोलिस आल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. सोबतच आम्ही तहसीलदाराशी बोलून यावर तोडगा काढतो, असे आश्वासन पोलिसांनी दिले, परंतू त्यावर समाधानकारक तोडगा पोलिसांकडून निघत नसल्याचे दिसून आल्याने ग्रामस्थांनी मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयासमोरच जाळला. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, आम्ही यापूर्वी सुद्धा अंत्ययात्रा याच जागेवरून नेल्या आहेत. त्यामुळे आता मार्ग बदलून आम्ही अंत्ययात्रा नेणार नाही, तसेच आमचे फक्त इतकेच म्हणणे की, आम्हाला स्मशानभूमीत या मार्गाने जाऊ द्यावे.
(हेही वाचा : शिवसेनेचा ‘हा’ मोठा नेता पक्षाला कंटाळलाय!)
पोलिसांचे म्हणणे, तो व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल!
अकलुज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुगवकर यांनी या विषयावर बोलताना स्पष्ट केले आहे की, हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात आला आहे. ती जागा खासगी मालकीची असल्याने त्या जागेवरून संबंधित जागा मालकाने अंत्ययात्रा नेण्यास नकार दिल्याने, तसेच ग्रामस्थ मात्र त्याच जागेवरून अंत्ययात्रा येण्यासाठी आग्रही असल्याने हा पेच वाढला. त्यासंदर्भात आम्ही तहसीलदारांशी बोलून तोडगा काढू त्यासाठी पोलिसांनी वेळ मागितला, असेही सुगवकर म्हणाले.
Join Our WhatsApp Community