जलवाहिन्यांवरील कामे पूर्ण, तरीही ४ फेब्रुवारीपर्यंत ‘या’ सर्व विभागांमध्ये होणार कमी दाबाने पाणी पुरवठा

157

भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त ४,००० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे महानगरपालिकेच्यावतीने ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळपासून हाती घेतलेली कामे आता पूर्ण झाली आहे. ज्या १४ विभागातील पाणीपुरवठा बाधित झाला होता, त्या विभागांसह सर्व विभागांचा पाणीपुरवठा आता हळूहळू पूर्वपदावर येत सुरळीत होत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पाणी गाळून व उकळून पिण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे करण्यात आले आहे. जलवाहिन्यांवरील ही कामे पूर्ण झाली असली तरी पुढील ४ फेब्रुवारीपर्यंत या सर्व विभागांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

( हेही वाचा : मुंबईकरांना दिलासा! CNG अडीच रुपयांनी स्वस्त, ८७ रुपये प्रतिकिलो दराने मिळणार )

मुंबई महापालिकेच्यावतीने एकाच वेळी जलवाहिन्यांवरील ३८ कामे हाती घेण्यात आल्याने मुंबईकरांची पाण्यासाठी त्रेधातिरपीट उडाली. सोमवारी ३० जानेवारी सकाळी दहा वाजता हाती घेण्यात आलेले काम मंगळवारी सकाळी १० वाजता पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु हे काम वाढल्याने संध्याकाळी ६वाजेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याने सोमवारचा दिवस पाण्याविना काढणाऱ्या नागरिकांना मंगळवारही पाण्याविना काढावा लागला. त्यामुळे पाण्यासाठी अनेक इमारती आणि वस्त्यांमध्ये धावाधाव सुरु होती. मुंबईकरांनी मंगळवारी पाणी येणार या अपेक्षेने पाण्याचा वापर जपून केला असला तरी मंगळवारी अनेकांच्या घरातील भांडी आणि पाण्याच्या टाक्या रिकाम्या झाल्याने पाण्यासाठी चारही दिशांना धावाधाव करावी लागली.

मुंबईकरांना करण्यात येणारा दैनंदिन पाणीपुरवठा हा सुरळीतपणे व्हावा, यासाठी महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे आणि पाणीपुरवठा प्रकल्प खात्याद्वारे पाणीपुरवठा विषयक सुधारणांची तसेच परिरक्षणाची विविध कामे महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल व अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनानुसार वेळोवेळी हाती घेतली जातात. याच कामांचा भाग म्हणून भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त ४,००० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम महानगरपालिकेद्वारे ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळपासून हाती घेण्यात आले होते. तसेच भांडुप संकुलाशी संबंधित असलेल्या जल वाहिन्यांवर २ ठिकाणी झडपा बसविणे, नवीन जलवाहिन्यांची जोडणी करण्यासह २ ठिकाणी उद्भवलेली गळती दुरुस्त करणे इत्यादी कामेही हाती घेण्यात आली होती. ही सर्व कामे आता पूर्ण झाली असून ज्या १४ विभागातील पाणीपुरवठा प्रभावित झाला होता.

याबाबत अधिक माहिती देताना मुंबई महानगरपालिकेचे जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी कळविले आहे की, ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजेपासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच दि. ३१ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत महानगरपालिकेच्या २४ विभागांपैकी काही विभागातील पाणीपुरवठा बंद होता. या अंतर्गत पश्चिम उपनगरातील के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य, आर उत्तर, एच पूर्व आणि एच पश्चिम हे ९ विभाग; तर पूर्व उपनगरातील एस विभाग, एन विभाग आणि एल हे ३ विभाग; यानुसार १२ विभागांचा यात समावेश होता. त्याचबरोबर ‘जी उत्तर’ आणि ‘जी दक्षिण’ या २ विभागातील काही परिसरांमध्ये २५ टक्के कपात लागू करण्यात आली होती.

ज्या कामांसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता, अगर पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली होती, ती सर्व कामे जल अभियंता खात्याच्या चमुद्वारे दिवसरात्र पद्धतीने व युद्ध पातळीवर अव्याहतपणे करण्यात आली. जल अभियंता खात्याद्वारे करण्यात आलेली संबंधित कामे आता पूर्ण झाली असल्याने पाणीपुरवठा हळूहळू पूर्वपदावर येत असून सुरळीत होत आहे. परंतु , नवीन जलवाहिनीची जोडणी, झडपा बसविणे व उद्भवलेल्या गळतीची दुरुस्ती करणे व इतर काही तांत्रिक कामे नुकतीच करण्यात आलेली असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून व उकळून वापरावे, असे आवाहन जल अभियंता खात्याद्वारे करण्यात येत आहे.

मुंबईकरांना करण्यात येणारा पाणीपुरवठा हा अधिक सुरळीतपणे व चांगल्या पद्धतीने व्हावा, यासाठी ही कामे हाती घेण्यात आली होती. या तांत्रिक व परिरक्षण विषयक कामे योग्यप्रकारे पूर्ण झाली असली, तरी देखील जल अभियांत्रिकीय दृष्टीकोनातून येत्या ४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत या १२ विभागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. तरी कृपया पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याच्या कालावधी दरम्यान नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावे व महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.