मुंबईकरांचे पाणी विजेने पळवले… पुढील काही दिवस पाणी कपातीचे!

114

मुंबईला निम्म्यापेक्षा जास्त भातसा धरणातून पाणीपुरवठा केला जात असून हा पाणी पुरवठा करण्याऱ्या भातसा विद्युत केंद्रांमध्ये बिघाड झालेली आहे. त्यामुळे विद्युत केंद्रामधील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याने, मुंबई शहर आणि उपनगरातील पाणी पुरवठ्यामध्ये १५ टक्के कपात लागू करण्यात आली आहे. ही कपात दोन दिवस अथवा दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत राहणार असल्याचे जल अभियंता विभागाने जाहीर करत नागरिकांना पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन केले आहे.

( हेही वाचा : महापालिका रुग्णालयांतील भूलतज्ज्ञांना विटामिन ‘एम’चा डोस )

जल अभियंतांनी केले आवाहन

मुंबईला प्रत्येक दिवशी सर्व धरणांतून ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यात महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील भातसा धरणातून दररोज सुमारे २ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे निम्म्या पेक्षा जास्त पाण्याचा पुरवठा या भातसा धरणातून केला जातो. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी भातसा येथील १५ मेगावॅट विद्युत केंद्रांमध्ये मोठी तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबईला होणार्‍या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामध्ये जवळजवळ ४० टक्के कपात झाली आहे. हा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. सध्या उपलब्ध होणार्‍या पाणीपुरवठ्यावर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणूनच सद्यस्थितीत मुंबई शहर आणि उपनगरात १५ टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. सर्व मुंबईकर नागरिकांनी याची नोंद घेऊन पाणी जपून वापरावे व बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जल अभियंता विभागाने केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.