मुंबईच्या ‘या’ भागाने तोडला ६६ वर्षांच्या मार्च हिटचा रेकॉर्ड!

123

संपूर्ण दक्षिण कोकणात सूर्य आग ओकत असताना मुंबईतील विक्रोळी भागांत कोकणपट्टयातील सर्वात जास्त कमाल तापमानाची नोंद झाली. विक्रोळीत चक्क कमाल तापमान ४४.९ अंश सेल्सिअसवर पोहोचले. मुंबईत २८ मार्च रोजी १९५६ साली कमाल तापमान ४१.७ अंश सेल्सिअसवर होते. मात्र नजीकच्या घाटकोपर स्थानकात कमाल तापमानात चक्क पाच अंशाचा फरक आढळला. घाटकोपरमध्ये ३९.९ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमानाची नोंद झाली. या दोन्ही केंद्रातील तापमान तपासावे लागेल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक जयंता सरकार यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना दिली.

या दोन्ही ठिकाणी मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने स्वयंचलित केंद्र बसवली आहेत. मात्र दोन्ही नजीकच्या ठिकाणातील फारसे अंतर नसताना विक्रोळीतील कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत कसे पोहोचले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

( हेही वाचा : मुंबईतील ‘या’ १२ केंद्रांवर होणार ‘१२ ते १४’ वयोगटातील मुलांचे लसीकरण! )

कर्जतमधील कमाल तापमान ४४.८ अंश

हाच प्रकार मुंबई महानगर परिसरातील कर्जतमधील स्वयंचलिक केंद्रातून मिळालेल्या कमाल तापमानानाबाबत झाला. कर्जतमधील कमाल तापमान ४४.८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. हा प्रकार स्थानिक तापमानातील चढउतार असावा, असे उपमहासंचलक जयंता सरकार म्हणाले. कर्जतपासून जवळअसलेल्या बदलापूर येथे ४१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी केली. त्यांच्याकडे स्वतःचे तापमान मोजक मशीन आहे. हा फरकही चार अंशाने दिसून येत असल्याने कर्जतमधील तापमान नोंदीबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

मुंबईतील इतर भागांतील कमाल तापमान

गेल्या काही दिवसांपासून पवई आणि मुलुंडमध्येही तापमानाचा भडका उडत आहे. मंगळवारी पवई आणि मुलुंडमधील कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसवर, चेंबूर ४१.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. या स्थानकांनीही मुंबईतील गेल्या ६६ वर्षांच्या मार्च महिन्यातील कमाल तापमानाचा रेकॉर्ड मोडला. त्याखालोखाल कुलाब्यात ३४.८ अंश सेल्सिअस, सांताक्रूझ आणि माटुंग्यात ३७.५ अंश सेल्सिअस, राम मंदिरात ३८.१ अंश सेल्सिअस, छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात ३८.२ अंश सेल्सिअस, बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय परिसरात ४०.७ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान नोंदवले गेले.

मुंबई महानगर परिसरातील कमाल तापमान

भाईंदर येथे कमाल तापमान ३५.७ अंश सेल्सिअस, पालघर आणि विरारमध्ये ४० अंश सेल्सिअस, मीरारोडमध्ये ४०.५ अंश सेल्सिअस पर्यंत कमाल तापमानाची नोंद झाली. वाशीत ४०.३ अंश सेल्सिअस, उल्हासनगर आणि मुंब्र्यात ४१.१ अंश सेल्सिअस, पनवेल आणि तळोजामध्ये ४१.२ अंश सेल्सिअस, कोपरखैराणे येथे ४१.३ अंश सेल्सिअस, कल्याण-डोंबिवलीत ४१.४ अंश सेल्सिअस, भिवंडीत ४१.८ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमानाची नोंद खासगी हवामान अभ्यासकांनी केली.

( हेही वाचा : बसमध्ये तुमचाही फोन हरवलाय? तर ही यादी वाचाच )

अजून दोन दिवस उष्णतेच्या लाटा 

बुधवारीही संपूर्ण कोकण परिसरात उष्णतेच्या लाटांची परिस्थिती दिसून येईल. त्यानंतर गुरुवारी उत्तर कोकणात केवळ उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती राहील. त्यानंतर तापमान पूर्ववत होण्यास सुरुवात होईल. असे, मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक जयंता सरकार यांनी सांगितले.

काय काळजी घ्याल –

  1. दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर जाणे टाळा.
  2. दीर्घ काळ आजारी व्यक्ती, तसेच रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेली व्यक्ती, लहान बालके किंवा ज्येष्ठ व्यक्तींनी शक्यतो दिवसा घराबाहेर जाणे टाळावे. या वयोगटाला उष्णतेशी संबंधित आजार बळकावण्याची भीती असते.
  3. कॉटनचे तसेच फिक्या रंगाचे कपडे परिधान करा. अवजड कपडे घालू नका.
  4. भरपूर पाणी प्या. घराबाहेर जात असाल तरीही पाण्याची बाटली आवर्जून बाळगा.
  5. लिंबू सरबत, लस्सी, ताक आदी द्रवपदार्थांचे सेवन करा
  6. चहा, कॉफी, दारूचे सेवन टाळा
  7. डोक्यावर टोपी किंवा सुती कपडा बांधा.
  8. या काळात सतत घराबाहेर असणा-या व्यक्तीला चक्कर येण्याची शक्यता असते. या लोकांनी सतत शरीराव पाण्याचा थोड्या वेळाने मारा करावा. शरीर थंड राहण्यासाठी या माणसांचा पाण्याशी संपर्क येणे गरजेचे आहे. जास्त त्रास उद्भवल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.