राज्यात मान्सूनचा जोर वाढणार

99

वेधशाळेला हुलकावणी देणा-या वरुणराजाने अखेर राज्यात सक्रीय होत असल्याचे संकेत दिले आहेत. दक्षिण कोकणात शनिवार-रविवार ऑरेंज अलर्ट तसेच उर्वरित बहुतांश भागांत मंगळवारपर्यंत यलो अलर्ट मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने जारी केला आहे. एका दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत दुपारी मान्सूनधारा सक्रिय झाल्या. मुंबईसह उर्वरित कोकणात वीकेण्डसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात सरींचा वर्षाव सुरु असताना सायंकाळच्या साडेपाचच्या नोंदीत उत्तर कोकणात पावसाचा जोर वाढला. मुंबईतील सांताक्रूझ येथे २.४ मिमी, कुलाब्यात १.६ मिमी पावसाची नोंद झाली. मुंबई नजीकच्या डहाणूत केवळ ५.८ मिमी पावसाची नोंद झाली. अलिबागमध्ये केवळ १.६ मिमी पाऊस पडला. त्यातुलनेत रत्नागिरीत १६.५ मिमी , हरणाईत १५.६ मिमी पाऊस झाल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिली आहे.

( हेही वाचा : कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश! १०० टक्के रिक्त पदे भरण्यास मान्यता)

शनिवार-रविवारसाठीचा हवामानाचा अंदाज –

पालघरमध्ये शनिवारी अतिवृष्टीसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगडमध्ये शनिवारी-रविवारी यलो अलर्ट तर रायगडमध्ये मंगळवारपर्यंत ऑरेंज अलर्ट आणि रत्नागिरीत शनिवारी-रविवारी ऑरेंज अलर्ट तर सोमवारी यलो अलर्ट जारी करण्यात आला. सिंधुदुर्गात शनिवारी ऑरेंज अलर्ट तर मंगळवारपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला.

धुळे,नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि पुण्यात शनिवारसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक आणि पुणे वगळता इतर भागांत केवळ मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट राहील. या दोन्ही जिल्ह्यांत शनिवारी मुसळधार सरी कोसळतील. कोल्हापूर आणि सोलापूरातील घाट भागांत मेघगर्जनेसह वीकेण्डला मुसळधार पाऊस राहील, असा अंदाजही मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.