रत्नागिरीमधील मालगुंड येथील किनाऱ्यावरून ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाची आणखी ३८६ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. मालगुंडच्या निसर्गरम्य ठिकाण असलेल्या गायवाडी बीचवर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या समुद्री कासवाच्या अंड्यांचे संवर्धन गेल्यावर्षीपासून सुरू आहे.
( हेही वाचा : राज ठाकरेंचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा; आता भरती सुरु आहे, पण… )
रत्नागिरीचे फॉरेस्टर गावडे तसेच रत्नागिरी जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मालगुंड गावच्या सरपंच श्वेता खेऊर आणि स्थानिक ग्रामस्थ ह्यांच्या सहकार्याने ही पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. यावेळी मालगुंडचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा मालगुंड तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, रत्नागिरी तालुका युवा सेनेचे तालुका युवा समन्वयक साईनाथ जाधव, हॉटेल व्यावसायिक संदीप कदम, शेखर खेऊर, कासवमित्र ऋषिराज जोशी आणि रोहित खेडेकर उपस्थित होते.
दरम्यान, ऑलिव्ह रिडले कासवांना गुहागर किनाऱ्यावर सॅटेलाईट टॅगिंग करण्यात आले आहे. कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांचा समुद्रातील भ्रमण मार्ग शोधण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षी पाच ऑलिव्ह रिडले कासवांना सॅटेलाईट टॅगिंग करण्यात आले होते. मात्र, ते सॅटेलाईट टॅग खराब निघाल्याने प्रकल्प अर्ध्यावरच राहिला होता.