३६ तासांपासून भुकेल्या बिबट्याचे तोंड अडकले पाण्याच्या रिकाम्या बाटलीत!

133

बदलापूर-वांगणी नजीकच्या गोरेगाव गावात गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक गावकरी, प्राणीप्रेमी संस्था आणि वनविभागाची टीम पाण्याच्या रिकाम्या बाटलीत तोंड अडकललेल्या बिबट्याला शोधत आहेत. रविवारी रात्री हा बिबट्या तोंडावर अडकलेली पाण्याची बाटली काढण्याच्या प्रयत्नात एका जंगलातीत वळणावरच गाडीसमोर आला. सुदैवाने वाहनचालकाच्या प्रसंगावधानतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. प्रत्यक्षदर्शींनीच ही माहिती वनविभागाला दिल्यानंतर हा प्रकार उजेडात आला.

गेल्या ३६ तासांपासून या बिबट्याला शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. बिबट्या हा अंदाजे अडीच वर्षांचा असावा. पाण्याचा रिकामा कॅन तोंडावर अडकल्याने दोन दिवसांपासून त्याने काहीच खाल्लेले नाही. त्याला सुखरुप पकडून पाण्याच्या कॅनमधून बिबट्याची सुटका करणे हे आव्हानात्मक असून, सर्वांच्या मदतीने बिबट्याचा शोध सुरु असल्याची माहिती ठाणे प्रादेशिक वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक तुळशीराम झिरवे यांनी दिली.

बेशुद्ध करुन पकडणे शक्य नाही

बिबट्या ३६ तासांपासून भूकेलेला आहे. त्याच्या पोटात पाण्याचा थेंबही गेलेला नाही. अशा परिस्थितीत त्याला बेशुद्ध करुन पकडणे धोक्याचे ठरेल. बिबट्याला पकडण्यासाठी ठाणे वनविभागाचे बचाव पथक तसेच बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे बचाव पथक यांच्या टीमही विभागून शोध घेत आहेत. या शोधमोहिमेकरिता ग्रामस्थांनी, प्राणीप्रेमी संस्थांनी चांगले सहकार्य दिले आहेत. बिबट्याला पकडल्यानंतर तातडीने सलाईन देऊन त्याची तब्येत पूर्ववत आणण्याची सर्व तयारी आम्ही केली आहेत. बिबट्याच्या तोंडावरील रिकामा प्लास्टिकचा कॅन काढून जीव वाचवणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

(हेही वाचा – राऊतांच्या गौप्यस्फोटाआधीच सोमय्यांनी उचलले ‘हे’ पाऊल!)

माणसांनो, जंगलात कचरा करु नका…

माणसांचा जंगल परिसरात वाढता हस्तक्षेप वन्यजीवांसाठी घातक ठरत असल्याचे या प्रकरणातून पुन्हा अधोरेखित झाले. जंगलाजवळचे फार्म हाऊस किंवा निसर्ग पर्यटन केंद्रात घनकचरा व्यवस्थापनची योग्य पद्धतीने विल्हेवाट झाली नाही तर पाण्यासाठी मानवी समूहाजवळ येणा-या वन्यजीवांचा जीवही जातो. कित्येकदा पाण्याच्या रिकाम्या कॅनमध्ये अडकून प्राणी-पक्ष्यांचा जीवही गेला आहे. मृत बिबट्याच्या पायावर काचेचे तुकडे आढळले आहेत. तुम्ही जंगल परिसरात वास्तव्यास असताना पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, चिप्सचे प्लास्टीक पेपर्स, काचेच्या बाटल्यांचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करा अन्यथा वन्यजीवांचा नाहक बळी जाईल, ठाणे वनविभागातील मानद वन्यजीव रक्षक अविनाश हरड यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.