रस्त्यांवरील बेवारस वाहनांविरोधात पुन्हा महापलिका इन ऍक्शन!

पहिल्याच आठवड्यात २ हजार ३८१ वाहनधारकांना नोटीस

159

मुंबईत रस्त्यांच्या कडेला बेवारस अवस्थेत सोडून दिलेली वाहनांविरोधात कारवाई करण्याची जबाबदारी कोविड काळात मुंबई महापालिकेने वाहतूक पोलिसांवर सोपवली होती. परंतु आता कोविड नियंत्रणात आल्यावर पुन्हा एकदा ही जबाबदारी मुंबई महापालिकेने आपल्या खांद्यावर घेतली आहे. ही जबाबदारी हाती घेताच पहिल्याच आठवड्यात अतिक्रमण विभागाच्यावतीने धडक कारवाई हाती घेऊन २ हजार ३८१ वाहनधारकांना नोटीस बजावली आहे. पैकी ३७९ वाहनधारकांनी आपली वाहने स्वतःहून हटवली आहेत. तर ३१४ दुचाकी, २८६ तीनचाकी आणि १८२ चारचाकी अशी एकूण ७८२ वाहने महानगरपालिका प्रशासनाने जप्त करून नेली आहेत. मात्र उर्वरित १२२० वाहनांच्या बाबतीत कोणतीही कार्यवाही करता आलेली नाही.

बेवारस वाहनांवर प्रशासनाकडून कारवाई

कोविड विषाणू संसर्ग कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे नागरी सेवा-सुविधांशी संबंधित दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त कोविड व्यवस्थापनाचे अतिरिक्त कामकाज असल्याने उपलब्ध मनुष्यबळावर ताण निर्माण झाला होता. त्यामुळे कोविड कालावधीत रस्त्यांच्या कडेला असलेल्या बेवारस वाहनांवरील कारवाई करण्याचे कामकाज महानगरपालिकेकडून वाहतूक पोलिसांकडे सोपविण्यात आले होते. सद्यस्थितीत, कोविड परिस्थिती नियंत्रणात येऊन जनजीवन पूर्वपदावर आले असताना आणि वाहतूक सर्वसामान्यपणे सुरु असताना बेवारस वाहनांसंदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत आहेत. या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याने, त्या संदर्भात कारवाई करण्याबाबत महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. त्यात उप आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) चंदा जाधव यांच्यासह सर्व परिमंडळांचे उप आयुक्त, सर्व २४ विभागांचे सहायक आयुक्त, पोलीस उप आयुक्त (वाहतूक), सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक), वरिष्ठ पोलीस निरिक्षक (वाहतूक) यांच्यासह इतर संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.

(हेही वाचा – ‘या’ लोकांनी आवर्जून ‘काश्मीर फाइल्स’ बघावा, मोहन भागवत म्हणाले…)

मुंबई महानगरात रस्त्यांच्या कडेला व इतरत्र बेवारस अवस्थेत सोडून दिलेल्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी कारवाई करणे, या कारवाईसाठी समन्वय साधणे तसेच या कामकाजामध्ये उद्भवत असलेल्या अडीअडचणी इत्यादी मुद्द्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने उचलून नेलेली बेवारस वाहने ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने पोलीस प्रशासनाला कारवाईवर मर्यादा येत असल्याचे सांगण्यात आले.

बेवारस वाहने उचलून नेण्याबाबतची कार्यवाही वाहतूक पोलिसांनी पूर्वीप्रमाणेच महानगरपालिका प्रशासनाकडे सोपवावी. त्यासाठी पोलिसांकडे असलेली टोईंग वाहने महानगरपालिकेकडे सुपूर्द करावीत. कोविडपूर्व कार्यपद्धतीनुसार महानगरपालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांनी बेवारस वाहनांवर कार्यवाही करावी. त्यासाठी आवश्यक कायदेशीर बाबींची पूर्तता करावी. उप आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) व सहायक आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकांचे आवश्यक ते पालन करावे, असे निर्देशही डॉ. संजीव कुमार यांनी या बैठकीत दिले होते.

बेवारस वाहनांचा लवकर होणार लिलाव

बेवारस अवस्थेत उचलून आणलेली वाहने ठेवण्यासाठी महानगरपालिकेकडे उपलब्ध असलेल्या बहुतांश जागांची क्षमता संपुष्टात आली आहे. ही बाब लक्षात घेता, या निर्देशानुसार उप आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) चंदा जाधव यांनी लक्षात आणून दिले होते की, वाहतूक पोलीस आणि इतर संबंधित शासकीय परवानग्या तातडीने प्राप्त करुन सदर वाहनांचा लिलाव करावा लागेल. जेणेकरुन, नव्याने येणाऱ्या बेवारस वाहनांसाठी जागा उपलब्ध होऊ शकेल. सर्व सहायक आयुक्तांनी आपापल्या विभागात उपलब्ध जागा, तेथे सद्यस्थितीत असलेली वाहने या अनुषंगाने माहिती पाठविण्याचे आवाहनही उप आयुक्त जाधव यांनी यावेळी केले होते. सर्व सहायक आयुक्तांनी यापूर्वीच्या बेवारस वाहनांचा लवकरात लवकर लिलाव होण्यासाठी १५ दिवसांच्या आत आवश्यक त्या सर्व परवानग्या प्राप्त कराव्यात व नियमानुसार लिलावाची कार्यवाही पूर्ण करावी. याबाबतचा नियमित आढावा संबंधित परिमंडळांच्या सह आयुक्त / उप आयुक्त यांनी घ्यावा, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिले होते.

७८२ वाहने महानगरपालिका प्रशासनाकडून जप्त

या बैठकीनंतर उपआयुक्त चंदा जाधव यांच्या देखरेखीखाली धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिका प्रशासनाने आठवडाभरात सर्व २४ प्रशासकीय विभाग मिळून आतापर्यंत २ हजार ३८१ वाहनधारकांना नोटीस बजावली आहे. पैकी ३७९ वाहनधारकांनी आपली वाहने स्वतःहून हटवली आहेत. तर ३१४ दुचाकी, २८६ तीनचाकी आणि १८२ चारचाकी अशी एकूण ७८२ वाहने महानगरपालिका प्रशासनाने जप्त करून नेली आहेत. विहित मुदतीत मध्ये प्रतिसाद न मिळाल्यास जप्त केलेल्या बेवारस वाहनांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लवकरच लिलाव केला जाणार आहे. नागरिकांनी रस्त्यांच्या कडेला बेवारस अवस्थेत वाहने सोडू नयेत आणि ज्यांची वाहने जप्त केली आहेत त्यांनी नोटीस मधील सुचनेनुसार प्रक्रिया पूर्ण करून, आवश्यक दंड भरून वाहने घेवून जावीत, असे महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.