राज्यातील अंगणवाड्यांचे प्राथमिक शाळेत विलीनीकरण होणार?

121

राज्यातील अंगणवाड्या प्राथमिक शाळांशी जोडण्याचा प्रस्ताव राज्य सरकारसमोर असून, पुढील शैक्षणिक वर्षांपासून त्याची अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात ५५ हजार सरकारी अंगणवाड्यांचे प्राथमिक शाळेत विलीनीकरण केले जाणार आहे.

(हेही वाचा – ‘मनसे’च्या नाराज वसंत मोरेंना पवारांकडून ऑफर; म्हणाले, ‘…वाट पाहतोय’)

अंगणवाडीमध्ये शिकणारी मुले जेव्हा प्राथमिक शाळेत जातात त्या वेळी नवीन शाळेत जुळवून घेण्यासाठी त्यांना दोन-तीन महिन्यांचा अवधी लागतो. अंगणवाड्यांच्या विलीनीकरणामुळे या मुलांना एकाच शाळेत जाण्याची सवय होईल आणि नवीन वातावरणाचा अनुभव येणार नाही. त्यासाठी हा उपक्रम पुढील वर्षापासून अमलात आणला जाणार आहे.

त्यासाठी अंगणवाड्यांमधील पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी शालेय शिक्षण विभागाकडून अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील ५५ हजार सरकारी अंगणवाडी केंद्रे जवळच्या प्राथमिक शाळेशी जोडण्यात येणार आहेत. राज्यात सुमारे १ लाख अंगणवाड्यांमधून पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यात येत असून उर्वरित ४५ हजार अंगणवाड्या टप्प्याटप्प्याने प्राथमिक शाळांमध्ये विलीन होणार आहेत. पहिल्या टप्प्यात विलीन होणाऱ्या ५५ हजारांपैकी ४० हजार अंगणवाड्या प्राथमिक शाळांच्या आवारात चालतात. उर्वरित १५ हजार अंगणवाड्यांना नजीकच्या प्राथमिक शाळेत जागा दिली जाईल.

अभ्यासक्रम तयार करणार

– महिला व बाल कल्याण विभागाच्या सहकार्याने शालेय शिक्षण विभाग हा उपक्रम राबवणार आहे.

– राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) सध्या पूर्व प्राथमिकसाठी अभ्यासक्रम तयार करीत आहे.

– या अंगणवाड्यांमधील मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. अंगणवाडी शिक्षिकांना या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

– पूर्व प्राथमिक शिक्षणाला प्राथमिक शिक्षणाशी जोडणे हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चा भाग असून त्यानुसार हा उपक्रम राबविला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.