बॅडमिंटनची सुरुवात ब्रिटिशांनी महाराष्ट्रातल्या ‘या’ शहरात केली होती; आज आपण आहोत चॅम्पियन

413

आज बॅडमिंटन हा खेळ क्रिकेटप्रमाणेच प्रसिद्ध झाला आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर हा खेळ खेळला जातोच, पण गल्लीतही हा खेळ लोकप्रिय झाला आहे. लहान व तरुण मुलांना क्रिकेटच्यासोबतच बॅडमिंटन खेळायला आवडतं. अगदी लहानश्या जागेत हा खेळ खेळता येतो. क्रिकेट किंवा फुटबॉलप्रमाणे फारसा पसारा नसतो त्यामुळे सोसायटीत हा खेळ सगळेच जण खेळताना दिसतात.

हा खेळ ब्रिटिशांनी निर्माण केला असला तरी आज आपण या खेळात चॅम्पियन आहोत. प्रकाश पादुकोण, सायना नेहवाल, पीव्ही सिंधू अशा जगज्जेत्यांनी भारताला अनेक पदके मिळवून दिली आहेत. पण तुम्हाला माहितीय का की या खेळाची सुरुवात कुठून झाली? या खेळाचा जन्म कुठे झाला? चला तर जाणून घेऊया बॅडमिंटनचा रंचक इतिहास…

( हेही वाचा : बेस्ट उपक्रमाचे वीजग्राहकांना आवाहन! बनावट SMS पासून सतर्क रहा)

 

बॅडमिंटनचा इतिहास

हा खेळ ब्रिटिशांनी निर्माण केला असं म्हटलं जात असलं तरी २००० वर्षंपूर्वी प्राचीन भारत व चीनच्या इतिहासात शटलकॉक आणि रॅकेटप्रमाणे खेळल्या जाणार्‍या खेळाचा उल्लेख सापडतो. युरोपमध्येही बॅटलडोर आणि शटलकॉक नावाचा खेळ खेळला जायचा. या खेळात खेळाडू बॅटलडोरने शटलकॉक उडवून अधिक काळासाठी तो कॉक हवेत उडवायचा. हा खेळ युरोपमध्ये लोकप्रिय होता. ज्यू डी विलेंट नावाचा अशाच प्रकारचा आणखी एक खेळ युरोपमध्ये साधारण १७ व्या शतकात लोकप्रिय झाला होता. १८६५ च्या दरम्यान ब्रिटिश ऑफिसर शटलकॉक हा खेळ खेळायचे.

badminton 1

पुणे तिथे बॅडमिंटनचा जन्म होणे

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की ब्रिटिश अधिकारी हा खेळ पुण्यात खेळायचे. काही लोकांचं म्हणणं आहे की काही भारतीय मुलं ब्रिटिश अधिकार्‍यांना असा खेळ खेळताना दिसले. या खेळाला पूर्वी शटलकॉक म्हटलं जायचं. मग ब्रिटिशांनी यामध्ये एक नेट लावली. आता या खेळा पूनाई किंवा पूना गेम असं म्हणू लागले. कारण शटलकॉक या खेळाला पुण्यात वेगळं स्वरुप मिळालं होतं. पूर्वी हा खेळ चेंडूनेही खेळला जायचा. विशेषकरुन चेंडूने खेळला जाणारा हा खेळ दक्षिण भारतात खेळला जायचा, या खेळाला बॉल-बॅडमिंटन असं म्हणायचे. भारतात असलेल्या ब्रिटिश सैनिकांनी वातावरणानुसार शटलकॉक ऐवजी बॉलचा वापर सुरु केला होता.

बॅडमिंटन हे नाव कसं पडलं?

भारतातून पुन्हा इंग्लंडमध्ये गेलेल्या सैनिकांनी हा खेळ तिथेही सुरु ठेवला. ईर्स्टवाईल ड्यूकला हा खेळ आवडला. १८७३ मध्ये ड्यूकने आपल्या इस्टेटीट ठेवलेल्या लॉन-पार्टीत जमलेल्या लोकांना या खेळाबद्दल सांगितलं. तिथेही त्याने हा खेळ सुरु केला. ड्यूकच्या इस्टेटीचं नाव ’बॅडमिंटन हाऊस’ असं होतं. म्हणूनच या खेळाचं नाव बॅडमिंटन असं पडलं. पुढे तर हा खेळ बॅडमिंटन या नावानेच ओळखला जाऊ लागला.

मग कॉकचा वापर करण्यात आला. आधी तर ४ – ४ लोक हा खेळ मिळून खेळायचे. त्यानंतर या खेळाचे नियम बदलून २ – २ किंवा १ – १ जण खेळू लागले. जसे आज सिंगल्स आणि डबल्स मॅच असतात.

मग बाथ बॅडमिंटन क्लबची स्थापना १८७७ रोजी भारतात झाली. भारतात जे काही नियम तयार झाले त्यात सुधारणा करुन नवीन नियम तयार करण्यात आले. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंग्लंडच्या स्थापनेच्या ६ वर्षांनंतर १८९९ मध्ये भारतीय बॅडमिंटन संघाची (बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया) स्थापना झाली. पुढे या खेळाला जागतिक दर्जा मिळू लागला.

इंटरनॅशनल बॅडमिंटन फेडरेशनची स्थापना १९३४ रोजी करण्यात आली. पुढे या फेडरेशनचं नाव बदलून बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन असं ठेवण्यात आलं. १९३६ रोजी भारतही अधिकृतपणे यात सामील झाला. मग १९९२ रोजी ऑलिम्पिक खेळांमध्ये दीपांकर भट्टाचार्य आणि यू विमल कुमार हे पहिल्यांदा खेळले होते. त्यानंतर मात्र अनेक भारतीय खेळाडुंनी बॅडमिंटनच्या कपवर आपलं नाव कोरलं.

प्रकाश पादुकोण

पादुकोण

दीपिका पादुकोण ही प्रकाश पादुकोणची मुलगी आहे हे तुम्हाला माहिती आहे का? प्रत्येक खेळाला ठराविक कालावधीत ग्लॅमर प्राप्त होतं आणि खेळाडूला स्टारडम. प्रकाश पादुकोण हे पहिले बॅडमिंटन स्टार होते. त्यांच्याआधी कुणालाही म्हणावं तसं स्टारडम मिळालं नव्हतं. १९८० रोजी त्यांनी पहिल्यांदा ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशीप भारताला जिंकून दिली होती. ते जगात क्रमांक १ चे पुरुष खेळाडू होते.

गोपीचंद पुलेला

पुलेला

१९९० ते २००० मध्ये गोपीचंदने उत्तम कामगिरी बजावली होती. २००१ मध्ये त्याने ऑल इंग्लंड जिंकला आणि मग तो जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. त्यानंतर मात्र भारताला या खेळात अच्छे दिन आले.

सायना नेहवाल

नेहवाल

सायना नेहवाल ही गोपीचंदची शिष्या. तिने पहिल्यांदाच भारताला ऑलिम्पिक मिळवून दिलं. तिने २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिक वुमेन्स सिंगल्समध्ये कांस्य पदक पटकावलं. २०१५ मध्ये ती जगात प्रथम क्रमांकाची एकमेव भारतीय महिला खेळाडू होती.

पी व्ही सिंधू

व्ही सिंधू

सिंधूलाही चांगलंच स्टारडम मिळालं आणि तिने तसं कर्तृत्वही गाजवून दाखवलं. सम्मर ऑलिम्पिक खेळात तिने कांस्य पदक मिळवलं तर रियो २०१६ च्या स्पर्धेतही तिने पदक पटकावलं. २०१९ मध्ये तिने विश्व चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक मिळवून भारताची मान उंचावली. आजही ती उत्तम कामगिरी करुन भारताला या स्पर्धेत पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतेय.

तर हा होता बॅडमिंटनचा इतिहास. हा खेळ पुण्यात सुरु झाला आणि मग आपण भारतीयांनी या खेळात खूप मोठं योगदान दिलं आहे हे पाहिलं. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करुन नक्कीच सांगा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.