बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्तीमधील यलम्मा देवीच्या दर्शनाला निघालेल्या भक्तांवर काळाने घाला घातला आहे. भक्तांच्या वाहनाला भीषण अपघात होऊन सहा जणांचा मृत्यू झाला. रामदुर्ग तालुक्यातील चिंचनूर गावातील विठ्ठल देवस्थानाजवळ बुधवारी मध्यरात्री हा अपघात झाला. यातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
पिकअप वाहनातून हे भाविक प्रवास करत होते. वळणावळणाच्या रस्त्यामुळे ताबा सुटून वाहन वडाच्या झाडाला जाऊन आदळल्याने हा अपघात घडला. अपघातातील मृत भाविक हे रामदुर्ग तालुक्यातील हुल कंद गावाचे रहिवासी होते. हनुमाव्वा, दीपा, सविता, सुप्रीता, मारुती, इंदिरव्वा अशी मृतांची नावे आहेत.
6 जणांचा मृत्यू
सौंदर्य हुल कुंद गावातून दर्शनासाठी यल्लम्मा देवीच्या मंदिराकडे जात असताना ही घटना घडली. अपघातग्रस्त गाडीतून 23 जण प्रवास करत होते. यातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाची रुग्णालात उपचार सुरु असताना, प्राणज्योत मालवली. अपघातानंतर पोलीस अधीक्षक डाॅक्टर संजीव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
( हेही वाचा: वनाधिकाऱ्यांना २५ दिवस हुलकावणी देणारा वाघ ‘असा’ अडकला सापळ्यात )
गाडीत बसले आणि अपघात झाला
भाविक यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी मंदिराकडे पायी निघाले होते. यावेळी संबंधित वाहन चालकाने या भाविकांना जाताना पाहिले. त्याने गाडी थांबवली आणि भाविकांना मंदिरापर्यंत सोडतो असे सांगितले. यानंतर सर्व भाविक गाडीत बसले. परंतु वाहनात बसल्यानंतर काही मिनिटांतच अपघात झाला आणि त्यात सहा जणांचा मृत्यू झाला.