बेस्ट बससाठी मुंबईत स्वतंत्र मार्गिका? वाहतूक कोंडीवर बीआरटीएसचा पर्याय

75

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईतील वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी, ठरलेल्या वेळेत न पोहोचणे अशा अनेक समस्या मुंबईकरांना येत आहेत. सध्या मुंबईत वाहनांची संख्या ४३ लाखांवर पोहोचली आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये ही संख्या दुपटीने वाढली आहे. यामुळे प्रामुख्याने बोरिवली, जोगेश्वरी, गोरेगाव, वांद्रे या परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. या भागातून अनेक प्रवासी मुंबईच्या दिशेने प्रवास करत असतात. या वाहतूक कोंडीचा सर्वात मोठा फटका मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बसत आहे. बेस्ट बसने दिवसभर लाखो मुंबईकर प्रवास करतात पण या वाहतूक कोंडीमुळे बस वेळेत नाही परिणामी प्रवाशांना वेळेत कार्यालयात, शाळेत, महाविद्यालयात वेळेत पोहोचता येत नाही.

( हेही वाचा : स्वस्त मस्त BEST! आता ३१ ऑगस्टपर्यंत करता येणार १ रुपयांत बसप्रवास; योजनेला मुदतवाढ )

‘मुंबई मोबिलिटी फोरम’चे सर्वेक्षण

यासाठीच मुंबईत बीआरटीएस प्रकल्प राबवून स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशाप्रकारची मार्गिका पुणे आणि गुजरातमध्ये अस्तित्वात आहे याच धर्तीवर मुंबईच सुद्धा बीआरटीएसची मुहूर्तमेढ रोवण्याचा विचार सुरू आहे. बेस्ट उपक्रम आणि वाहतूक तज्ज्ञांचा सहभाग असलेल्या ‘मुंबई मोबिलिटी फोरम’ने या संदर्भातील सर्वेक्षण सुरू केले आहे. बेस्ट बसगाड्यांसाठी पश्चिम द्रुतगती मार्गावर स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करता येऊ शकते यावर सध्या अभ्यास सुरू आहे यानंतर पूर्वगती मार्गाचा विचार करण्यात येईल अशी माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेशचंद्र यांनी दिली आहे.

स्वतंत्र मार्गिकेसाठी प्रयत्नशील

सध्या मुंबईतील निरनिराळ्या मार्गावर ३ हजार ६८० बस धावत असून यात ३२ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. भविष्यात हा ताफा १० हजारापर्यंत व्हावा अशी उपक्रमाची योजना आहे. तसेच बेस्ट बसमधून करणाऱ्या प्रवाशांची संख्याही ४० लाखांवर जाईल असा विश्वास बेस्टकडून व्यक्त करण्यात आला आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी लवकरच मुंबई मोबिलिटी फोरम स्वतंत्र मार्गिकेसाठी प्रयत्नशील आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.