वेळेत वेतन मिळत नसल्याने आणि पीएफसह (PF) अन्य देणी थकविल्याच्या निषेधार्थ बेस्टमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी यापूर्वी अनेकवेळा कामबंद आंदोलन पुकारले होते. याचा प्रवाशांना सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसला. परंतु एम.पी. ग्रुप या कंत्राटदाराने कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा कामबंद आंदोलन करून सुद्धा त्यांना वेळेत वेतन न दिल्यामुळे आता कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
१९ मे रोजी सकाळपासून वडाळा आगारातील एकही कंत्राटी बस सेवेत नसून कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. तसेच कुर्ला आगारात कामगारांचे संख्याबळ कमी पडत असल्यामुळे धारावी, मजास, घाटकोपर, देवनार, शिवाजीनगर येथील अधिकाऱ्यांनी कुर्ला डेपोला प्रत्येकी 2 चालक द्यावेत. चालकांना कुर्ल्याला पाठवण्यापूर्वी त्यांनी डीडीएम कुर्ला बागायतकर यांच्याशी संपर्क साधावा. AM आणि PM (दोन्ही शिफ्ट) मधील 2 चालकांना एमपी ग्रुप कंत्राटी कामगार संप मागे घेईपर्यंत दररोज कुर्ला आगारात पाठवावे असे उपक्रमाने सांगितले आहे.
( हेही वाचा : ‘बेस्ट’ विरोधात टाटा मोटर्सची मुंबई उच्च न्यायालयात धाव )
बेस्ट कंत्राटी कर्मचारी संपावर
सतत पगाराच्या तारखा बदलत असल्याने वाहन चालकांची शारीरिक, आर्थिक तसेच मानसिक स्थिती खालावत आहे, तुटपुंज्या पगारात घर चालवणे बिकट झाले आहे. या गोष्टींचा निषेध म्हणून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी १८ मे २०२२ रोजी काळ्या फिती बांधून काम केले. तसेच आश्वासनानुसार १८ मे रोजी पगार व पीएफ जमा न झाल्यास १९ मे पासून आम्ही बेमुदत संप जाणार असे बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पत्र जारी करत स्पष्ट केले आहे. तसेच याविषयी सर्व कामगारांना सहकार्य करावे अशी विनंतीही बेस्ट कंत्राटी चालकांनी केली आहे.
बेस्ट कधी कामगारांची झाली नाही, मग ती कंत्राटी कामगारांची कशी होईल
याआधी सुद्धा कंत्राटदाराच्या कंत्राटी बसवरील कामगारांचे वेतन (जवळपास पाच महिन्याचे) वेळेवर न दिल्यामुळे कंत्राटी बस कामगारांनी संप केला होता. बेस्ट चालवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी बेस्ट कशी फायद्यात येईल हे बघायचे सोडून कॉन्ट्रॅक्टरच्या बस व कंत्राटी कामगार आणून स्वताचे खिसे कसे भरतील यासाठी बेस्ट नुकसान केले. यावरून हे लक्षात येते की, या सत्ताधाऱ्यांचा बेस्ट जगवण्यापेक्षा बेस्ट संपवून बेस्टच्या शेकडो एकर जागेवर डोळा आहे. आताच्या सत्ताधाऱ्यांची बेस्ट कधी कामगारांची झाली नाही, मग ती कंत्राटी कामगारांची कशी होईल. असा आरोप सुनील गणाचार्यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community