‘स्वरनाट्य रसगंगा’ पुस्तकातील ‘सांस्कृतिक पुंजी’ नव्या पिढीसाठी उपयुक्त – निलम गोर्‍हे

124

इतिहासाची ओळख नव्याने करून देण्याची आवश्यकता असते. महाराष्ट्राशी, मराठी मनाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाला मराठी रंगभूमीचा माहितीपूर्ण इतिहास सांगणार्‍या ‘स्वरनाट्य रसगंगा’ या पुस्तकाचा उपयोग होईल, पुस्तकरूपाने निर्माण करण्यात आलेली सांस्कृतिक पुंजी नव्या पिढीसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे यांनी शनिवारी या पुस्तकाचे प्रकाशन करताना व्यक्त केला. न्याय मिळविताना मराठी माणसाची भूमिका विरक्त असावी पण संन्यस्त नसावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मराठीतील हौशी-प्रायोगिक रंगभूमीची नाट्यपंढरी असलेल्या आणि 127 वर्षांची अखंडित कारकीर्द असलेल्या भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे 150 वर्षांतील मराठी रंगभूमीचा माहितीपूर्ण रंजक इतिहास ‘स्वरनाट्य रसगंगा’ या नावाने पुस्तक रूपात प्रसिद्ध करण्यात आला आहे.

नाटक, संगीत नाटक हा मराठी मनाचा अविभाज्य भाग

सामाजिक आशय दर्शविणार्‍या संगीत एकच प्याला, संगीत शारदा या नाटकांनी समाजप्रबोधन केले. साहित्य, कला, संस्कृतीचे पुण्याने जतन केले असून ऐतिहासिक संस्था म्हणून भरत नाट्य संशोधन मंदिराचा गौरवाने उल्लेख करावा लागेल, असे सांगून डॉ. गोर्‍हे म्हणाल्या, मराठी नाटक, संगीत नाटक हा मराठी मनाचा अविभाज्य भाग आहे. नाटकातील अभिनय वेगळा आणि राजकारण वेगळे, राजकारणी लोकांना अभिनय ओळखता येणे गरजेचे असते. कोण खरे, कोण खोटे हे समजणे गरजेचे असते, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

तरुणाईने पेलले नाट्यसंगीताचे शिवधनुष्य

पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर युवा पिढीतील 15 गायक-गायिकांनी ‘स्वरनाट्य रसगंगा’ हा नाट्यगीतांचा बहारदार कार्यक्रम सादर केला. ज्येष्ठ गायक अभिनेते चारुदत्त आफळे यांचाही या कार्यक्रमात विशेष सहभाग होता. 150 वर्षांतील लोकप्रिय नाट्यगीते या निमित्ताने रसिकांना ऐकायला मिळाली. अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या ‘शाकुंतल’ या नाटकातील ‘पंचतुंड नररूंड मालधर’ या नांदीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘उजळीत जग मंगलमय’, ‘दान करी रे’, ‘मी पुन्हा वनांतरी’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘तारिणी नव वसन धारिणी’, ‘जय गंगे भागिरथी’, ‘मधुकर वन वन फिरत’ आदी नाट्यगीते सादर करण्यात आली.

(हेही वाचा – मणिपूरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; कर्नलसह ७ जणांचा मृत्यू)

मदनाची मंजिरी या नाटकातील ‘ये मौसम है रंगीन’ या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. 13 ते 30 या वयोगटातील कलाकारांनी सादरीकरण केले. निधी घारे, ललित देशपांडे, अनुष्का आपटे, ऋतुज घोटगे, पूर्णा दांडेकर, अर्णव पुजारी, उत्तरा पेंडसे, होनराज मावळे, निकेता कानिटकर-लेले, ऋचा कुलकर्णी, तुषार देशपांडे आणि सावनी लाड यांचा समावेश होता. तर हिमांशु जोशी (ऑर्गन), प्रथमेश देवधर (तबला) या युवा पिढीतील कलाकारांनी साथसंगत केली.

या पुस्तकाची प्रस्तावना ज्येष्ठ अभिनेते आणि भरत नाट्य संशोधन मंदिराचे विश्वस्त रवींद्र खरे यांनी लिहिली आहे. उपस्थितांचे स्वागत आनंद पानसे, रवींद्र खरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय जबडे यांनी केले. विविध भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर व्हावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. आभार रवींद्र खरे यांनी मानले. शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे उपस्थित होते. दीपक दंडवते, संजय डोळे, विश्वास पांगारकर, राम धावारे यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे तसेच पुस्तकाच्या लेखिका अर्चना साने, यशश्री पुणेकर, पुस्तकाचे संपादक गोपाळ अवटी, डॉ. मेधा कुलकर्णी, भरत नाट्य संशोधन मंदिराचे विश्वस्त रवींद्र खरे, अध्यक्ष आनंद पानसे, कार्याध्यक्ष अभय जबडे यांची रंगमंचावर उपस्थिती होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.