मध्य रेल्वेची सर्वोत्तम कामगिरी; 2021-22 मध्ये पायाभूत सुविधांच्या सुधारणांमध्ये गाठले महत्वाचे टप्पे

मानवयुक्त लेव्हल क्रॉसिंग निर्मूलनात आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी

90

2021-22 या वर्षात, मध्य रेल्वेने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केल्याचे समोर आले आहे. 2021-22 मध्ये पायाभूत सुविधांच्या सुधारणांमध्ये मध्यरेल्वेने महत्वाचे टप्पे गाठले आहेत. मध्य रेल्वेने नवीन लाईन, दुहेरीकरण, 3 री/4थी आणि 5 वी/6 वी लाईन आणि विद्युतीकरण यासह विविध पायाभूत सुविधांच्या सुधारणांमध्ये महत्वाचे टप्पे गाठले. मध्य रेल्वेवर एकूण नवीन लाईन, दुहेरीकरण, 3 री लाईन आणि 5 वी आणि 6 वी लाईनची आतापर्यंतची सर्वोच्च पूर्णता कार्यान्वित झाली आहे.

मध्य रेल्वेकडून यासाठी एकूण 177.11 कि. मीटरचे काम करण्यात आली आहेत. त्यामध्य अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ प्रकल्पाचा सोलापूरवाडी-आष्टी ही 31 किमी लाईन केली गेली. तर ताकारी-किर्लोस्करवाडीचे 8.46 कि.मी.चे दुहेरीकरण झाले आहे. आंबळे-राजावाडी 4.72 किमी झाले आहे. तर पुणे-मिरज दुहेरीकरण प्रकल्पातील लोणंद-साल्पा-आदारकी हा प्रकल्प 17 किमी आणि किर्लोस्करवाडी-आमनापूर-भिलवडी13.66 किलो मीटरचे काम करण्यात आले आहे.

तिसरी लाईनही पूर्ण

दौंड-मनमाड दुहेरीकरण प्रकल्पाचा अंकाई- अंकाई किल्ला यासाठी 4.58 किमी, दौंड-वाडी दुहेरीकरण प्रकल्पातील भालवणी-वाशिंबे 26.37 किमी, वर्धा-बल्हारशा मार्गाची जळगाव-भादली 12 किमी, सोनेगाव-हिंगणघाट 16.17 किमी आणि इटारसी-नागपूर मार्गाची काटोल-कोहली 25.15 किमी या दरम्यानची तिसरी लाईनही पूर्ण करण्यात आली आहे. ठाणे-दिवा पाचवी आणि सहावी लाईनचा हा प्रकल्प 18 किमी प्रमाणे करण्यात आला आहे.

100 टक्के विद्युतीकरणही पूर्ण

तसेच पुणे-मिरज-कोल्हापूर (सिंगल लाईन) आणि दौंड-सोलापूर-वाडी विभाग पूर्ण झाल्यामुळे 339 किमीचे विद्युतीकरण केले गेल्यामुळे सुवर्ण चतुर्भुज मार्गांचे शंभर टक्के विद्युतीकरणही पूर्ण झाले आहे. मध्य रेल्वेने 2021-22 मध्ये रोड ओव्हर ब्रिज/रोड पुलांखालील आणि मर्यादित उंचीच्या भुयारी मार्गांद्वारे 90 मानवयुक्त लेव्हल क्रॉसिंग काढून टाकण्यात आली आहे. ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवण्यात आली आहे. मुंबई विभाग 6; भुसावळ विभाग 33, नागपूर 20, पुणे 20 आणि सोलापूर 11 मानवयुक्त लेव्हल क्रॉसिंग काढून टाकण्यात आली आहेत. 2020-21 मध्ये 78 लेव्हल क्रॉसिंगच्या निर्मूलनाची यापूर्वीची सर्वोत्तम कामगिरी करण्यात आली होती.

(हेही वाचा – एसटी महामंडळाचे ५१ संपकरी कर्मचारी रूग्णालयात दाखल)

अनिल कुमार लाहोटी, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणाले की, क्षमता वाढल्याने मध्य रेल्वेला रेल्वे वाहतुकीतील अडचणी दूर करण्यास मदत होईल. ते म्हणाले की विद्युतीकरण पर्यावरणपूरक आहे आणि मध्य रेल्वे 2022-23 मध्ये 100 टक्के मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण करेल. लेव्हल क्रॉसिंगमुळे वाहतूक कोंडी होते. या मानवयुक्त लेव्हल क्रॉसिंगचे निर्मूलन रस्ते वापरकर्त्यांसाठी तसेच रेल्वेसाठी नक्कीच वरदान ठरेल. यामुळे ट्रेन्सचा खोळंबा टळतो तसेच रस्ते वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेत सुधारणा देखील झालेली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.