शंखी गोगलगायीमुळे झालेल्या नुकसानीसाठी दुप्पट मदत मिळणार

103

राज्यात लातूर, उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्यांमध्ये शंखी गोगलगायीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याबाबत मदत देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार बाधित शेतकऱ्यांना ९८ कोटी ५८ लाख रुपये निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी पेक्षा वाढीव दराने मदत वितरीत करण्यात येणार आहे. या आपत्तीमुळे १ लाख १८ हजार ९९६ शेतकरी बाधीत झाले आहेत. या शेतकऱ्यांसाठी ९८ कोटी ५८ लाख रुपयांची मंजूर मदत तातडीने वितरीत करण्याचे आदेश नुकतेच मदत व पुनर्वसन विभागाकडून काढण्यात आले आहेत.

(हेही वाचा – BCCI बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! सौरव गांगुलीसह जय शाह पदावर राहणार कायम)

नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधितांच्या मदतीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानुसार जिरायत शेतीसाठी पूर्वीचा दर प्रति हेक्टरी ६८०० वरून वाढवून प्रति हेक्टरी १३ हजार ६०० रुपये, बागायत शेतीसाठी प्रति हेक्टरी १३ हजार ५०० रूपयांवरुन २७ हजार रुपये आणि बहुवार्षिक शेतीसाठी पूर्वीचा दर १८ हजार रुपयांवरून ३६ हजार रुपये करण्यात आला आहे. जिरायत, बागायत व बहुवार्षिक पिकांच्या बाबतीत यापूर्वी दोन हेक्टरच्या मदतीत वाढ करून प्रति तीन हेक्टर अशी वाढ करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठीचा मदतीचा निधी संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ऑनलाइन पद्धतीने जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.