मुंबईतील पारा घसरला! १७ अंशावर किमान तापमानाची नोंद, पुढच्या २४ तासांत ‘या’ भागात थंडीची लाट

111

राज्यात उत्तरेतून वाहणारे वारे प्रभावी ठरल्याने काही भागांत तापमान खाली घसरले आहे. सोमवारी मुंबईतील किमान तापमान १७ अंश सेल्सिअसवर  खाली घसरले. या तापमान नोंदीमुळे मुंबईतील गेल्या पाच वर्षांतील नोव्हेंबर महिन्यातील निच्चांकी तापमानाची नोंद झाली. पुण्यातील किमान तापमानाने नोव्हेंबर महिन्यातील गेल्या नऊ वर्षांतील निच्चांकी तापमानाचा विक्रम मोडला. पुण्यात ८.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. अजून २४ तासांत मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहील, असा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे.

(हेही वाचा – ‘या राज्यपालांना कोठे पाठवायचे तिथे पाठवा पण…’; शिंदे गटाने केली ‘ही’ मागणी)

याआधी ३० नोव्हेंबर २०१७ रोजी मुंबईत १८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. रविवारपासून राज्यात काही भागांत सुरु झालेल्या थंडीच्या वाढत्या प्रभावाने मुंबईतील किमान तापमान आता खाली घसरायला सुरुवात झाली आहे. जळगावात १० अंशाखाली घसरलेल्या किमान तापमानामुळे सध्या जळगावात राज्यातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद होत आहे.

सध्या मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांत किमान तापमान १० अंशाखाली सरकले आहे. सोमवारच्या किमान तापमानाच्या नोंदीत, महाबळेश्वर येथे १०.४ अंश सेल्सिअस, अहमदनगर येथे ९.७ अंश सेल्सिअस, नाशिक येथे ९.२ अंश सेल्सिअस, औरंगाबाद येथे ८.९ अंश सेल्सिअस, पुणे येथे ८.८ अंश सेल्सिअस एवढी नोंद झाली. विदर्भात केवळ यवतमाळ येथे किमान तापमान १० अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले आहे. येत्या २४ तासांच नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद आणि जालना येथे थंडीच्या लाटेचा प्रभाव दिसून येईल, अशी माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.