सार्वजनिक शौचालयांना पिण्याच्याच पाण्याचा पुरवठा!

107

मुंबईतील सार्वजनिक शौचालयांमध्ये वापरण्यात येणारे पाणी हे कूपनलिका किंवा रिंग बांधून त्यातून उपलब्ध करून देण्याचे निर्देश यापूर्वीच आयुक्त अजोय मेहता यांनी दिलेले असतानाही प्रशासन म्हणते हे शक्य नाही. कूपनलिकेतून येणारे पाणी क्षारयुक्त असते. प्रसाधनगृहामध्ये अशाप्रकारचे पाणी जास्त प्रमाणात वापरले तर ते वापरकर्त्यांच्या आरोग्यास हानीकारक ठरु शकते. तसेच क्षारयुक्त पाण्यामुळे शौचालयातील लोखंडी पाईपलाईन तसेच नळ आदी बाबी लवकर गंजण्याची प्रक्रिया होत असल्याने सर्वच ठिकाणी कूपनलिका खोदणे भौगोलिकदृष्टया अनैसर्गिक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मुंबईतील सार्वजनिक शौचालयांमध्ये महानगरपालिकेने दिलेल्या जलजोडण्या काढून, सदर सर्व शौचालयालगत महानगरपालिकेकडून कूपनलिका खणण्यात याव्यात आणि त्या पाण्याचा वापर सदर शौचालयांमध्ये करण्यात यावा. जेणेकरून, पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टळेल, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका दक्षा पटेल यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती.

शौचालयांना स्वतंत्र पाण्याची व्यवस्था करणे

जलाशयांमधून पेय जलाचा पाणी पुरवठा करणा-या जलवाहिन्यांतून घरगुती जलजोडणीसोबतच सार्वजनिक शौचालयांमध्येदेखील जलजोडण्या देण्यात आल्या आहेत. शौचालयांमध्ये पेय जलाचा वापर हा एक प्रकारचा पाण्याचा अपव्ययच आहे. काही प्रसंगी पाणी वाचविण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून पाणी कपात केली जाते. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते. पाण्याची वाढत जाणारी गरज व पाण्याचा अपव्यय ही भविष्यातील धोक्याची घंटा ओळखून महानगरपालिका हद्दीतील सर्व सार्वजनिक शौचालयांना स्वतंत्र पाण्याची व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे झाले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

( हेही वाचा : राणीबागेतील पेंग्विनच्या बारशासाठी ‘तारीख पे तारीख’… )

कूपनलिकेतून येणारे पाणी क्षारयुक्त

यावर प्रशासनाच्यावतीने उत्तर देताना, मुंबईत साधारणपणे ८८७ सार्वजनिक शौचालये असून ही सर्व शौचालये वर्दळीच्या ठिकाणी जनतेसाठी बांधलेली आहेत. यामध्ये बहुतांश ठिकाणी महापालिकेच्या जल जोडणीतून पाणी पुरवठा होत असून काही ठिकाणी कूपनलिका तसेच टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची व्यवस्था संबंधित संस्थांद्वारे करण्यात येत असल्याचे त्यांनी या उत्तरात म्हटले आहे. या सार्वजनिक शौचालयांमध्ये बहुतांश ठिकाणी महिला व पुरुषांसाठी स्रानगृहही उपलब्ध आहेत. त्याचा लाभ जनता घेत असते. मुंबईची भौगोलिक स्थिती पहाता मुंबई हे समुद्रालगत बसलेले शहर असल्याने संपूर्ण जमीन क्षारयुक्त आहे. त्यामुळे कूपनलिकेतून येणारे पाणी क्षारयुक्त असते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे आहे .

प्रसाधनगृहामध्ये अशाप्रकारचे पाणी जास्त प्रमाणात वापरले तर त्याचा वापर करणाऱ्यांच्या आरोग्यास हानीकारक ठरु शकते. तसेच क्षारयुक्त पाण्यामुळे शौचालयातील लोखंडी पाईपलाईन, नळ इ. बाबी लवकर गंजण्याची प्रक्रिया होते. तसेच सर्वच ठिकाणी कूपनलिका खोदणे भौगोलिकदृष्टया शक्य नसल्याचे म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.