ईडीकडून लवकरच बड्या राजकीय नेत्याला समन्स, राज्यातील राजकारणात उडणार खळबळ

150

राज्यात पुन्हा एकदा ईडीच्या कारवाईने जोर धरला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने अटक केलेले उद्योजक प्रवीण राऊत यांच्या चौकशीत ईडीच्या हाती काही महत्वाचे पुरावे लागलेले असून लवकरच ईडीकडून राज्यातील एका बडे नेते आणि मावळते खासदार यांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात येणार असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण

गोरेगाव येथील भूखंड विक्रीत एफएसआयमध्ये झालेल्या पत्रा चाळ जमिनीच्या १०३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे प्रवीण राऊत यांना मागील आठवड्यात अटक करण्यात आलेली आहे. प्रवीण राऊत हे ईडीच्या कोठडीत आहे. प्रवीण राऊत यांना यापूर्वी पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात फेब्रुवारी २०२१ मध्ये ईडीकडून अटक करण्यात आली होती. या प्रकरणात ईडीकडून प्रवीण राऊत यांची ७० कोटींची मालमत्ता जप्त केली होती.

ईडीने कोणता केला आरोप

ईडीकडून प्रवीण राऊत यांच्या गैरव्यवहाराबाबत चौकशी सुरू असताना ईडीच्या हाती काही कागदपत्रे आणि पुरावे हाती लागले आहे. राऊत यांच्या पत्नी माधुरी यांच्या बँक खात्यावरून संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यावर सुमारे ५५ लाख रुपयांचा व्यवहार झाला होता, हे ५५ लाख प्रवीण राऊत याने बेकायदेशीर व्यवहारातून मिळवले होते, असा ईडीचा आरोप असून ईडीने चौकशी सुरू केल्यानंतर १० वर्षांनी हे ५५ लाख रुपये बिनव्याजी परतवण्यात आले असल्याचे ईडीच्या सूत्रांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – लता मंगेशकर यांच्या नावे अभ्यास केंद्र उभारण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाच्या अंगलट!)

समन्समुळे राज्याच्या राजकारणात उडणार खळबळ

प्रवीण राऊत यांना एचडीआयएलच्या व्यवहारातून झालेल्या आर्थिक फायदयानंतर राऊत यांनी २०१० ते २०१२ मध्ये अलिबाग येथे मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करण्यात आली, या जमिनीचा व्यवहार रोख रकमेतून झालेला असून या रोख रकमेच्या व्यवहाराची ईडीकडून तपास करण्यात येत आहे. ईडीने जमिनीचे कागदपत्रे ताब्यात घेतलेली असून अलिबागच्या स्थानिकांकडून ज्या जमिनी खरेदी करण्यात आलेल्या होत्या, या जमिनीचा व्यवहार कोणत्या परिस्थितीत करण्यात आला याबाबतचा जबाब देखील ईडीकडून नोंदवला जात आहे. जमिनी खरेदी करतांना येथील जमीनदारावर कुठला दबाव होता का ? याबाबत चौकशी सुरू असल्याचे ईडीच्या सूत्राकडून कळते. या व्यवहारात राजकीय हस्तक्षेप करण्यात आला होता असा संशय व्यक्त करण्यात येत असून त्यासाठी लवकरच राज्यातील एका बड्या राजकीय नेत्याला तसेच मावळते खासदार यांना ईडीकडून समन्स पाठवण्यात येणार असून या समन्समुळे राज्याच्या राजकारणात लवकरच खळबळ उडणार असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.