४ फेब्रुवारी : Bhimsen Joshi यांचा जन्मदिन; जाणून घेऊया त्यांचा जीवन परिचय

48

भीमसेन गुरुराज जोशी (Bhimsen Joshi) यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९२२ रोजी कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील रोण गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गुरुराज जोशी असे होते, ते कन्नड-इंग्रजी शब्दकोशाचे लेखक व विद्वान होते आणि आईचे नाव गोदावरी देवी होते, ज्या गृहिणी होत्या. भीमसेन त्यांच्या १६ भावंडांमध्ये सर्वात मोठे होते. लहानपणीच त्यांची आई देवाघरी गेली आणि नंतर त्यांच्या सावत्र आईने त्यांचे संगोपन केले.

भीमसेन जोशी (Bhimsen Joshi) ज्या शाळेत शिकत होते त्या शाळेच्या वाटेवर एक ‘भूषण ग्रामोफोन शॉप’ होते. भीमसेन ग्राहकांना वाजवण्यात येणारी गाणी ऐकण्यासाठी उभे राहायचे. एके दिवशी त्यांनी ‘अब्दुल करीम खान’ यांनी गायलेल्या ‘राग वसंत’ मधील ‘फगवा’, ‘ब्रिज देखन को’ आणि ‘पिया बिना नही आवत चैन’ ही ठुमरी ऐकली. काही दिवसांनी कुंडगोल येथील एका महोत्सवात त्यांनी सवाई गंधर्वांना ऐकले. त्यांच्या गायनाने भीमसेन प्रभावित झाले. तेव्हा ते केवळ ११ वर्षांचे होते.

त्यांच्या बालमनामध्ये सवाई गंधर्वांना आपले गुरु बनवण्याची इच्छा प्रबळ झाली. आपल्या मुलाची संगीतातील आवड जाणून त्याचे वडील गुरुराज यांनी ‘चनाप्पा कुर्तकोटी’ यांना भीमसेनचे संगीत शिक्षक म्हणून नियुक्त केले. एकदा पंचाक्षरी गवईने भीमसेन यांचे गाणे ऐकले आणि चनप्पाला म्हणाले, “या मुलाला शिकवणे तुमच्या क्षमतेच्या पलीकडचे आहे, त्याला एका चांगल्या शिक्षकाकडे पाठवा.”

(हेही वाचा राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानावर परराष्ट्र मंत्री S. Jaishankar यांचा पलटवार; म्हणाले, देशाची प्रतिमा…)

भीमसेन (Bhimsen Joshi) रात्रंदिवस संगीताचा सराव करायचे आणि कधीकधी सराव करताना कुठेही झोपी जायचे. यामुळे त्यांच्या वडिलांना त्यांची काळजी वाटायची. मग त्यांनी भीमसेनच्या शर्टवर लिहिले, “हा शिक्षक जोशींचा मुलगा आहे.” आणि ही कल्पकता कामी आली आणि भीमसेन कुठेही झोपी गेले असले तरी लोक त्यांना घरी घेऊन यायचे.

पुढे जोशी यांनी विविध गुरूंकडून प्रशिक्षण घेतले आणि त्यांची अनोखी शैली विकसित केली, विशेषतः खयाल गायन प्रकारात. जोशी यांची कारकीर्द सहा दशकांहून अधिक काळ चालली, या काळात त्यांनी भारतात आणि परदेशात मोठ्या प्रमाणात कामगिरी केली. त्यांचा सक्षम आवाज, श्वासांवर नियंत्रणासाठी ते प्रसिद्ध आहेत.

१९४१ मध्ये, भीमसेन जोशी (Bhimsen Joshi) यांनी वयाच्या १९ व्या वर्षी रंगमंचावर पहिले सादरीकरण केले. त्यांचा पहिला अल्बम वयाच्या २० व्या वर्षी रिलीज झाला, ज्यामध्ये कन्नड आणि हिंदीतील काही धार्मिक गाणी होती. दोन वर्षांनी, त्यांनी मुंबईत रेडिओ कलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यांच्या गुरूंच्या स्मरणार्थ त्यांनी वार्षिक ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सव’ सुरू केला. हा महोत्सव दरवर्षी डिसेंबरमध्ये पुण्यात होतो.

पंडित भीमसेन जोशी (Bhimsen Joshi) यांचे “मिले सूर मेरा तुम्हारा” हे गीत देखील सुप्रसिद्ध झाले. ज्यामध्ये त्यांनी बालमुरली कृष्ण आणि लता मंगेशकर यांच्यासोबत सादरीकरण केले होते. त्यांच्या गौरवशाली कारकिर्दीसाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि २००९ मध्ये भारतरत्न यासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २४ जानेवारी २०११ रोजी त्यांचे निधन झाले, त्यांनी जगभरातील संगीतकार आणि संगीत प्रेमींना प्रेरणा देणारा वारसा मागे सोडला आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.