मामा…लवकर येऊन वाचव, वडील आम्हा सर्वांना ठार करतायत! लातूरमध्ये कौटुंबिक हत्याकांडाचा प्रयत्न

124

लातूर जिल्ह्यात एक हदय पिळवटून टाकणारी घटना घडली. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील एका शेतक-याने आपल्या पत्नी आणि दोन मुलांना विष पाजून त्यांचा गळा चिरल्याचा प्रकार घडला आहे. इतकेच नव्हे, तर त्याने स्वत: सुद्धा विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पण ऐनवेळी त्याच्या 14 वर्षांच्या मुलाला जाग आल्याने  मोठा अनर्थ टळला आहे.

असा टळला अनर्थ…

लातूर येथील रहिवासी असणारे शेतकरी आतिष बाबूराव नरके यांनी गुरुवारी आपण फिरायला जाऊ असे सांगत आपली पत्नी आणि दोन मुलांसह दुचाकीने अंबाजोगाईला नेले. पण तिकडे राहायला लाॅज न मिळाल्याने ते हाॅटेलमध्ये जेवण करुन लातूरकडे निघाले. वाटेत त्याने एका गावाकडे आपली दुचाकी वळवली आणि एका शेतातील उसाच्या फडाजवळ जाऊन थांबवली. या ठिकाणी आतिष याने टाॅनिक असल्याचे सांगत पत्नीसह दोन मुलांना विष पाजले आणि त्यांची शुद्ध हरपल्यानंतर त्यांच्यावर ब्लेडने वार केले. त्यानंतर स्वत: ही विष प्राशन करुन गळ्यावर वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या थरारक प्रकारानंतर काही वेळातच 14 वर्षीय मुलाला जाग आली. त्याने घडला प्रकार लगेचच आपल्या मामाला फोन करुन सांगितला. मामाने क्षणाचाही विलंब न करता घनास्थळी धाव घेतली आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या बहिणीच्या कुटुंबाला रुग्णालयात नेले. मुलगा शुद्धीवर होता पण बाकी तिघे बेशुद्ध होते. मामाने स्थानिक लोकांच्या मदतीने चौघांना लातूरच्या एमआयटी रुग्णालयात दाखल केलं. सध्या मुलगा आणि त्याचे वडिल शुद्धीवर आले आहेत, पण पत्नी व त्यांच्या मुलीची परिस्थिती नाजूक आहे.

( हेही वाचा: यंदाच्या प्रजासत्ताक संचालनात झळकणार ‘कास पठार’)

म्हणून उचलले टोकाचे पाऊल

कर्जबाजारीपणाला कंटाळून पत्नीसह मुलांची हत्या करून आपणही आत्महत्या करणार आहे, अशी माहिती आतिष नरके यांनी त्यांच्या मेहुण्याला दिली होती. यानंतर मेहुण्याच्या फिर्यादीवरून रेणापूर पोलिस ठाण्यात शेतकरी आतिष नरके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.