मुंबईतील रस्त्यांवर पडलेले खड्डे पुढील ४८ तासात पूर्ववत करण्यात यावेत या मागणीसाठी भारतीय जनता शिष्टमंडळाने आमदार मिहीर कोटेचा यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी महापालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे पुढील ४८ तासांत भरण्यात येतील असे आश्वासन दिले आहे. या शिष्टमंडळात गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेते विनोद मिश्रा, नगरसेविका रेणू हंसराज आदी उपस्थित होते.
( हेही वाचा : BEST@75 : बेस्टची पंचाहत्तरी; 7 ऑगस्टला साजरा होणार ‘अमृतमहोत्सवी बेस्ट दिन’ )
मुंबईकरांना चांगले दर्जेदार खड्डेमुक्त रस्ते मिळाले पाहिजेत
मुंबई शहरात गेल्या २० वर्षात रस्ते बनविण्यासाठी २१ हजार कोटी खर्च करण्यात आला. मात्र तरीही प्रत्येक पावसाळ्यात मुंबईकरांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतो. परिणामी मुंबईतील नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागतो. वाहनांचा खोळंबा होतो. याही पावसाळ्यात मुंबईतील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. गेल्या दोन दिवसांपासून भारतीय जनता पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधींनी विविध विभागातील रस्त्यांची अभियंत्यासोबत खड्ड्यांची पाहणी केली असता खड्ड्यांची परिस्थिती अतिशय बिकट असल्याचे निदर्शनास आले. ही परिस्थिती ध्यानात घेऊन भारतीय जनता पार्टी शिष्ट मंडळाने आयुक्तांची भेट घेऊन मुंबईकरांना चांगले दर्जेदार खड्डेमुक्त रस्ते मिळाले पाहिजेत अशी आग्रही भूमिका यावेळी मांडली. महापालिका आयुक्तांनी यास सकारात्मक प्रतिसाद देत येत्या ४८ तासांत खड्डे पूर्ववत करण्यात येतील असे आश्वासित केले व तशा प्रकारचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.