शनिवारी चंद्रपुरातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात स्वाती ढुमणे या महिला वनरक्षकाचा वाघीणीकडून झालेल्या हल्ल्यात बळी गेला. या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. वाघाच्या हल्ल्यात बळी पडणा-या वनअधिका-यांसाठी मिळणारी आर्थिक मदत समाधानकारक नसल्याची खंत वनमजूर संघटनेकडून व्यक्त होत आहे.
सरकारकडून मदत मिळावी
स्वाती ढुमणे यांच्या दोन्ही मुलांचा विचार करता एक कोटी रुपयांची मदत सरकारने करावी, अशी मागणी वनरक्षक, वनपाल, वनमजूर संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांनी केली. नुकसानभरपाईची किंमत किमान ५० लाखापर्यंत वाढायला हवी, अशी मागणी पाटील करत आहेत. ढुमणे यांना दोन लहान मुले आहेत. त्यांच्या भविष्यासाठी प्रत्येकी पन्नास लाखाप्रमाणे एक कोटींची आर्थिक रक्कम सरकारने द्यायला हवी, असे पाटील म्हणाले.
( हेही वाचा : मुंबईत ५ कोटींचे ड्रग्स जप्त! गुन्हे शाखेची मोठी कारवाई )
स्वाती ढुमणे यांना श्रध्दांजली
रविवारी संघटनेकडून नागपूर येथील जपानी गार्डनर येथे ढुमणे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी पाटील बोलत होते. घटनेचे गांभीर्य पाहता व्याघ्र गणनेचे काम थांबवा, काम सुरु करायचे असल्यास एका वनरक्षकासह पाच वनमजूर, अशी टीम क्षेत्रीय कामासाठी दिली जावी, अशी मागणी पाटील यांनी केली. मृत स्वाती ढुमणे यांच्या पतीला शासकीय सेवेत सामावून घ्यावे, त्यांच्या दोन्ही मुलांच्या नावे बँकेत फिक्स डिपोझिटची खाती उघडून प्रत्येकी ५० लाख रुपये सरकारकडून दिली जावी, अशी मागणी पाटील यांनी केली. या रकमेतून दोन्ही मुलांचे शिक्षण होईल, अशी व्यवस्था असावी, असेही पाटील म्हणाले.
Join Our WhatsApp Community