मेळघाटातील ‘ग्रासमॅन’ ची कमाल, चित्त्यांसाठी तयार केले कुरणक्षेत्र

80

मेळघाटातील ‘ग्रासमॅन’ प्रा. गजानन मुरतकर यांनी मध्य प्रदेशातील कुनो पालपूर जंगलातील उजाड प्रदेशात २०१३ ते २०१९ अशी सलग सात वर्षे परिश्रम घेऊन व्याघ्र प्रकल्प कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने नामिबियामधून आलेल्या चित्त्यांसाठी योग्य कुरणक्षेत्र तयार केले आहे. याच मऊ गवतावर आता चित्त्यांची पावले पडणार आहेत.

( हेही वाचा : पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त शिल्पकाराने साकारले पाच फुटी वाळूचे शिल्प; पहा फोटो)

२०१२ साली राजस्थान व मध्य प्रदेशच्या सीमारेषेवर असलेल्या श्योपूर व मुरैना जिल्ह्यातील ३४४ वर्ग किलोमीटर परिसरातील कुनो व्याघ्र प्रकल्पात सिंह सोडण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी आवश्यक कुरणक्षेत्र तयार करण्याचे काम सुरू झाले होते. तेव्हा शुष्क पानझडीचे हे जंगल होते. परंतु, सिंह सोडण्याची योजना रद्द झाली. मात्र, कुरणक्षेत्र तयार झाल्यानंतर चित्त्यांसाठी योग्य वातावरणनिर्मिती तपासण्यात आली. देशातील १४पेक्षा अधिक राज्यांमध्ये गवती कुरण तयार करण्याचा अनुभव असलेले मेळघाटातील ग्रासमॅन प्रा. गजानन मुरतकर यांनी ही माहिती दिली.

दक्षिण आफ्रिकेच्या जंगलाशी कुनो पालपूर अभयारण्याचा परिसर मिळताजुळता असल्याचे आढळून आले आहे. गवा वगळता सर्व तृणभक्षी प्राणी असलेले कुनो हे देशातील पहिले अभयारण्य आहे. बोरीची काटेरी झाडे विपुल होती. कुरणक्षेत्र तयार करण्यात ते मोठे आव्हान होते. बोरीचे काटे चित्त्याच्या पायात रुतून जखमा होऊ नयेत म्हणून बोरीची झाडे पूर्णतः काढली गेली.

कुनो पालपूरचे वातावरण चित्त्यांसाठी उत्तम

तिन्ही ऋतूंमध्ये कुनो पालपूरचे वातावरण चित्त्यांसाठी उत्तम आहे. डेहराडून व इतर सर्व संस्थांनीसुद्धा तसा अहवाल दिला. कुरणक्षेत्र सर्वाधिक प्रमाणात विकसित झाले आहे. तृणभक्षी प्राण्यांची मुबलक संख्या व नदी असल्याने पाहुणा चांगला स्थिरावणार, यात दुमत नाही. – प्रा. गजानन मुरतकर, ग्रासमॅन, मेळघाट

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.