पवई तलावातील जलचरांना आयआयटी आणि रेनेसान्सचा धोका

91

पवई तलावानजीक वसलेल्या आयआयटी या शैक्षणिक संस्थेतील सांडपाणी थेट पवई तलावात सोडले जात असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. पवई तलावानजीकच्या रेनेसान्स या प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमधील सांडपाणीही थेट पवई तलावात सोडले जात असल्याचाही व्हिडिओ उपलब्ध झाला आहे. पवई तलावात मगरींचा अधिवास आहे. सध्याच्या काळात मगरींचा सहज संचारही तलावानजीकच्या परिसरात दिसून येत आहे. मगरींसह पवई तलावात कासवही दिसून येतात.

पवई तलावाला डबके बनवण्याचा प्रयत्न

मुंबईकरांना पाण्याचा साठा उपलब्ध करुन देण्यासाठी पवई तलावाची कृत्रिमपद्धतीने निर्मिती करण्यात आली परंतु तलावातील पाण्याची गुणवत्ता खालावल्याने पवई तलावातील पाणी पिण्यासाठी मुंबईकरांना उपलब्ध न करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला. पाण्याची गुणवत्ता अगोदरच वाईट असताना आयआयटीसारख्या केंद्रीय पातळीवरील शैक्षणिक संस्था थेट पवई तलावात सांडपाणी का सोडते, असा प्रश्न पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांनी केला. तलाव हा पाण्याचा स्त्रोत आहे, तलावातील पाणी पिण्यालायक नाही म्हणून त्यात सांडपाणी थेट सोडत, तलावाला डबके करण्याचा प्रकार आयआयटी आणि रेनेसान्स या पंचतारांकित हॉटेलकडून सुरु आहे. या प्रकारावर आळा घालायला हवा, अशी मागणीही पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांनी केली.

(हेही वाचा स्थायी समिती अध्यक्ष, आयुक्त हे ‘वाझे’, त्यांचा हॅन्डलर कोण? भाजपचा घणाघात)

सायकल ट्रॅकसाठी अगोदर सिमेंटीकरण आता डांबरही…

पवई तलावावर सायकल ट्रॅकचे काम जलदगतीने सुरु आहे. या सायकल ट्रेकसाठी सिमेंटीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर आता डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री पालिकेच्या व्हॉट्सअप एप्लिकेशनच्या उद्घाटन कार्यक्रमात सरकार पारदर्शक असल्याचा दावा करते आहे. मात्र नागरिकांना कामाची कल्पना न देता सायकल ट्रेक प्रकल्पाचे काम सुरु असल्याबाबत पर्यावरण कार्यकर्ते सुशांत बळी यांनी निषेध व्यक्त केला.

आयआयटीचे स्पष्टीकरण

एक जलवाहिनी चॉकअप झाल्याने हा प्रकार झाला आहे. इस्टेट विभाग सांडपाण्याच्या जलवाहिनीत साचलेला कचरा साफ करण्याचे काम करत असल्याची माहिती आयआयटीच्या जनसंपर्क विभागाने दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.