रत्नागिरीतील अध्यात्म मंदिरात स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सादर होणार कीर्तन

119

श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ (पावस) आणि रत्नागिरीतील अध्यात्म मंदिर, अखिल भारतीय कीर्तनकुल आयोजित कीर्तन मालिकेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी ह.भ.प. सौ. सुखदा मुळ्ये-घाणेकर कीर्तन सादर करणार आहेत. येत्या २३ व २४ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० ते ७.१५ या वेळेत वरच्या आळीतील अध्यात्म मंदिरात कीर्तन होणार आहेत.

( हेही वाचा : कोकणात धावली अगीनगाडी…; जन्माची तिच्या अद्भुत कहाणी )

दरमहा कीर्तने

गर्जा जयजयकार क्रांतीचा या नावाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ऑक्टोबर २०२१ ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत दरमहा कीर्तने सादर होत आहेत. कीर्तनकार सुखदा या मूळच्या रत्नागिरीकर असून सध्या पनवेलला स्थायिक आहेत. त्यांनी बीएस्सी बायोटेक्नॉलॉजी, एमए संगीताचे शिक्षण घेतले असून आतापर्यंत १०४ कीर्तने रत्नागिरी, सातारा, कराड, मिरज सांगली, पुणे आदी ठिकाणी केली आहेत. तर नारद मंदिर पुणे येथे होणाऱ्या कीर्तन परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. अखिल भारतीय कीर्तन संस्था (दादर) येथून त्या कीर्तन विशारद झाल्या असून रत्नागिरी आणि पुणे आकाशवाणीवर कीर्तन सेवा आणि युवा कीर्तनकार म्हणून त्यांची मुलाखत घेण्यात आली आहे.

कीर्तनाचा लाभ घ्यावा

ह.भ.प. सुखदा मुळ्ये-घाणेकर यांचे कीर्तनाचे प्राथमिक शिक्षण नारद मंदिर, पुणे येथे झाले असून त्यांचे कीर्तनातील गुरू हभप वैशाली घैसास, महेश बुवा काणे, मानसी बडवे, हर्षद बुवा जोगळेकर, नंदकुमारबुवा कर्वे हे आहेत. तसेच संगीताचे शिक्षण ज्येष्ठ गायिका सौ. मुग्धा भट- सामंत, डॉ. रसिका एकबोटे यांच्याकडे घेतले आहे. या कीर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ आणि अखिल भारतीय कीर्तन कुलतर्फे करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.