भाजपचे महापौरांना पत्र, ‘या’ नेत्यावर दाखवला अविश्वास

103

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेचे कामकाज ऑनलाईन पध्दतीने होत असून शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत अनेक महत्वाच्या विषयांवर समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपच्या सदस्यांना बोलण्याची संधीही दिली नाही. त्यामुळे एकप्रकारे अध्यक्ष हे भ्रष्टाचाराच्या मुद्दयावर बोलू न देता कोणत्याही चर्चेविना बहुमताच्या आधारे हे प्रस्ताव मंजूर करत लोकशाहीची मुल्ये पायदळी तुडवत आहेत. त्यामुळे भाजपने त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला असून स्थायी समितीच्या ९ सदस्यांच्या स्वाक्षरीचे पत्रच महापौरांना देण्यात आले आहे. त्यामुळे महापौरांना या पत्राच्या माध्यमातून अविश्वास ठराव मांडण्यासाठी तातडीची सभा घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

महानगरपालिकेची तातडीची सभा त्वरित बोलविण्याची केली मागणी

शुक्रवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या ऑनलाईन सभेत महत्वाच्या विषयावर जसे की, आर्थिक भ्रष्टाचार, कोविड काळातील गैरव्यवहार, शालेय विद्यार्थ्यांच्या टॅब खरेदीतील भ्रष्टाचार, पोयसर नदी मलजल प्रक्रिया केंद्राच्या प्रस्तावातील भ्रष्टाचारावर सदस्यांना आवाजी मागणी करूनही बोलू दिले नाही. तसेच प्रस्तावास तीन सुस्पष्ट दिवस झाले नसतानाही प्रस्ताव विचारात घेतले गेले. याबाबत भाजपने तीव्र नाराजी व्यक्त करत महापौर किशोरी पेडणेकर यांना अद्ययावत सुधारित मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या कलम ३६ (ह) अन्वये महानगरपालिकेची तातडीची सभा त्वरित बोलविण्याची मागणी केली आहे. यामध्ये त्यांनी स्थायी समिती अध्यक्ष, यशवंत जाधव यांच्या विरुद्ध स्थायी समिती अध्यक्ष म्हणून अविश्वास व्यक्त करण्यासाठी ही तातडीची सभा बोलावण्याची मागणी केली आहे. महापौरांना दिलेल्या पत्रांत भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे व त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांनी असे म्हटले आहे की, आयकर खात्याच्या अहवालानुसार महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भ्रष्टाचाराद्वारे जमा केलेले काळे धन सफेद करण्यासाठी पैशाची अवैध अफरातफर केल्याचे निदर्शनास आले आहे. स्थायी समितीच्या सभेत महत्वाच्या विषयावर बोलू न देणे हे सर्व कायदेविसंगत अनियमितता व लोकशाहीची मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या वर्तवणूकीबद्दल हा अविश्वास व्यक्त करीत आहोत, असे म्हटले आहे.

(हेही वाचा महापालिका कर्मचाऱ्यांना १५ हजारांचा वैयक्तिक आरोग्य विमा)

मुंबईच्या अनेक विकासकामांचे प्रस्ताव मागील तहकूब सभेमुळे रखडलेले

दरम्यान, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पत्रकारांशी औपचारिक बोलतांना, भाजप विरोध करणारच. ते आपले कर्तव्य पार पाडतात. परंतु मुंबईची अनेक विकासकामांचे प्रस्ताव हे मागील तहकूब सभेमुळे रखडलेले आहेत. ते मंजूर करणेही तेवढेच गरजेचे होते. या विकासकामांना कशाप्रकारे खिळ बसेल, रखडतील याचा विचार करत त्यांनी सभा तहकूबी मांडली होती. परंतु ती चुकीची असल्याने त्याला विरोध झाला. त्यामुळे त्यांनी या प्रस्तावांच्या मंजुरीच्या वेळी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड करण्यास सुरुवात केली. पण हे योग्य नसून त्यांच्या काही सुधारणा आणि त्यात काही त्रुटी असतील तर त्यांनी जरुर मांडावे. त्यांच्या सदस्यांना अनेक प्रस्तावांवर बोलूही दिलेले आहे. पण त्यानंतरही जर ते गोंधळ घालत असतील, तर आम्ही ते जुमानत नाही. कोणत्याही परिस्थितीत मुंबईकरांना सेवा सुविधा मिळायला हव्यात. त्याच्या विकासाचे प्रस्ताव थांबून उपयोग नाहीत म्हणून ते मंजूर केलेले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.