एसटी संपाचा आजचा १६ वा दिवस असून एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे, या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी या बेमुदत संपावर कायम आहेत. मात्र एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे, यासाठी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेतकरी अनिल पाटील यांनी आज कर्मचाऱ्यांच्या वतीने लोटांगण आंदोलन सुरु केल्याचे समोर आले आहे. सध्या या शेतकऱ्यांची सर्वच स्तरात चर्चा होताना दिसतेय. गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील एसटी संपकाऱ्यांचा हा संप सुरू असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासह महाविकास आघाडी सरकार कोणतीही भूमिका घेताना दिसत नाही. यामुळेच सोलापूर रूपभवानी ते तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरापर्यंत अनिल पाटील या शेतकऱ्यांनं तब्बल ४५ किलो मीटरपर्यंत लोटांगण घातल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – एसटीवर पवारांसोबत बैठक, तरीही तोडगा नाहीच!)
सरकारला सद्बुद्धी द्यावी, देवीला साकडं
अनिल पाटील हे शेतकरी सोलापूर जिल्ह्यातील शिरापूर येथील असून यांनी हे आंदोलन सुरु केलं आहे. यांनी सोलापूर ते तुळजापूर असे ४५ किलोमीटर अंतरचे लोटांगण घातले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना आई तुळजा भवानीने सद्बुद्धी द्यावी, असे म्हणून त्यांनी हे लोटांगण घातले.
याआधीही घातले होते १७१ लोटांगण
अनिल पाटील यांनी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यावरही त्यांनी तुळजाभवानीसमोर लोटांगण घातले होते. सुमारे १७१ लोटांगण घालून राज्याला चांगला मुख्यमंत्री लाभल्यामुळे देवीचे आभार मानले होते. मात्र आता त्याच मुख्यमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं ऐकून त्यांचं सरकारमध्ये विलिनीकरण करावं, अशी विनंती त्यांनी सरकारला केली आहे.