देशभरात लम्पीचा कहर! 57 हजारांहून अधिक गायींचा लम्पी व्हायरसमुळे मृत्यू

104

देशभरात पशुपालन करणारा मोठा वर्ग आहे, तर शेतकरी वर्गाचे उत्पन्नाचे साधन देखील आहे. मात्र त्यावर सध्या लम्पी या व्हायरसचे सावट आहे. या आजारामुळे देशभरात ५७ हजारांहून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. देशात १५ राज्यात १७५ जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. १५ लाखांहून अधिक गायींना या आजारांची लागण झाली आहे. तर आता पर्यंत ५७ हजारांहून अधिक गायींचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तर महाराष्ट्रात १७ जिल्हे या आजाराने प्रादुर्भावग्रस्त झाले आहे. लम्पी या जनावरांच्या गुरांच्या आजाराचा तडाखा हा जळगावपाठाेपाठ राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नगर जिल्हयाला बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावमध्ये आतापर्यंत १६ जनावरे दगावले असून त्यापाठापाठ नगरमध्ये १३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. लम्पी हा संकरित गायींना जास्त हाेताे व नगरमध्ये संकरित गायींची संख्या जास्त असल्याने ही संख्या वाढल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले. राज्यात सर्वप्रथम ४ ऑगस्टला जळगाव जिल्ह्यातील रावेर तालूक्यातील चिनावल या गावामध्ये लम्पीची लागण झाली.

(हेही वाचा – Make in India! कोरोनानंतर आता लम्पी व्हायरसवरही स्वदेशी लस)

त्यानंतर हा रोग झपाटयाने अहमदनगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, नाशिक व एकूण १९ जिल्ह्यांमध्ये पोहोचला. ११ सप्टेंबर अखेर एकूण ३१० गावांमध्ये २३८७ गुरांना बाधा झाली असून त्यापैकी २ हजार बरे झाले आहेत. तर जळगाव जिल्ह्यातील १६, अहमदनगर १३, अकोला १, पुणे ३, बुलढाणा ३ व अमरावती ३ वाशिम व धुळे प्रत्येकी एक अशा एकूण ४१ बाधित पशुधनाचा मृत्यू झाला आहे. लम्पी रोग या गाई-म्हशींना होणा-या विषाणूजन्य रोगाची साथ सध्या उत्तर भारतातील राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणासह अनेक राज्यात पसरली आहे. तेथे हजारो जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. तेथे गुरांच्या किंमती कमी झाल्याने तेथूनच व्यापा-यांंनी महाराष्ट्रात बाधित गुरे आणल्याने ही साथ महाराष्ट्रात झपाटयाने पसरली आहे. आता ही साथ आणखीनच तीव्र हाेत असून दरराेज चार ते पाच पशुधनांचा बळी जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.