… म्हणून आगामी 20 दिवसांसाठी 1100 गाड्या रद्द! रेल्वे मंत्रालयाचा निर्णय

97

देशात कडक उन्हामुळे वाढलेली विजेची मागणी पाहता कोळशाचा तुटवडा निर्माण झालाय. त्यामुळे वीज निर्मिती केंद्रांना जलद कोळसा पुरवठा करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने आगामी 20 दिवसांसाठी 1100 पॅसेंजर गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीपासून कोळशाच्या मागणीत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एप्रिल 2021 च्या तुलनेत यावर्षी एप्रिलमध्ये 15 टक्के जास्त कोळशाची वाहतूक झाली आहे.

अनेक राज्यांमध्ये कोळशाचा तुटवडा

गेल्या वर्षीच्या तुलनेत कोळशाची मागणी आणि वापर लक्षणीय वाढला आहे. त्यामुळे कोळशाची अधिक प्रमाणात वाहतूक होते आहे. मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या तुलनेत अतिरिक्त कोळसा रेक अधिक प्राधान्याने चालवले जात आहेत. या मुद्द्यावर केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनीही अनेक राज्यांमध्ये कोळशाचा तुटवडा असल्याचे मत व्यक्त केले. रशिया-युक्रेन युद्धामुळे कोळशाच्या आयातीवर परिणाम झाला आहे. याशिवाय कोळसा कंपन्यांची थकबाकी न भरल्याने आणि झारखंडमध्ये संपामुळे कोळसा संकट निर्माण झालाय.

(हेही वाचा – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल)

कोळसा संकटामुळे विजेची समस्या निर्माण

यापार्श्वभूमीवर रेल्वेने आता पुढील 20 दिवस सुमारे 1100 गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांमध्ये मेल एक्सप्रेस आणि पॅसेंजर या दोन्ही गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. एक्स्प्रेस गाड्यांच्या 500 फेऱ्या, तर पॅसेंजर गाड्यांच्या 580 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. देशातील उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा यासह अनेक राज्यांमध्ये कोळसा संकटामुळे विजेची समस्या निर्माण झाली होती. यानंतर केंद्र सरकारने अनेक बैठका घेतल्या. अनेक राज्यांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला, त्यामुळे लोकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आता ही समस्या आणखी वाढू नये यासाठी पावले उचलली जात आहेत. यापूर्वीही असा प्रश्न ऐरणीवर आलेला होता तेव्हाही रेल्वेने एक महिन्यासाठी 670 प्रवासी गाड्या रद्द केल्या होत्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.