मुंबई जागतिक स्तरावर वृक्षनगरी!

139

मुंबईत उभारण्यात आलेली मियावाकी जंगले, नियमितपणे करण्यात येणारे वृक्षारोपण, वृक्षांची घेण्यात येणारी शास्त्रशुद्ध निगा, जनजागृती, संबंधित संसाधनांचे वाटप अशा विविध मानकांच्या आधारे जागतिक स्तरावर ‘वृक्ष नगरी’ म्हणून मुंबईची निवड करण्यात आली आहे. मुंबईच्या पर्यावरणापूरकतेवर संयुक्त राष्ट्र संघाच्या संस्थेने यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे ‘वृक्ष नगरी’चा बहुमान मिळवणारे मुंबई हे देशातील दुसरे शहर ठरले आहे.

( हेही वाचा : ‘बेस्ट’ बसमध्ये कंडक्टरशिवाय मिळणार तिकीट! )

‘वृक्ष नगरी’ अशी एक नवी ओळख

मुंबईकर नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा देतानाच मुंबईतील पर्यावरणाची जोपासना करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावण विषयक कामांची दखल आता थेट संयुक्त राष्ट्र संघाच्या अखत्यारीतील संस्थेने घेतली आहे. या संस्थेने ‘वृक्ष नगरी’ अर्थात ‘Tree City’ चा ‘वर्ष २०२१’ साठीचा बहुमान आपल्या मुंबईला घोषित केला आहे. या गौरवामुळे ‘स्वप्न नगरी’ अशी ओळख असणाऱ्या मुंबई शहराला आता ‘वृक्ष नगरी’ अशी एक नवी ओळख मिळाली आहे. जागतिक स्तरावरील या गौरवाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिकेचे कौतुक केले आहे.

विशेष पत्रात मुंबई शहराचे अभिनंदन

मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज संपन्न झालेल्या एका विशेष बैठकीत दरम्यान राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या अखत्यारीतील ‘अरबोर डे फाऊंडेशन’ यांच्याद्वारे प्राप्त झालेल्या सन्मान पत्राची प्रत दिली आणि महानगरपालिकेच्या पर्यावरण पूरक कामांचे कौतुक केले.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या अखत्यारीतील ‘अरबर डे फाऊंडेशन’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅन लेंब यांनी या मुंबई शहराच्या बहुमानानिमित्त लिहिलेल्या विशेष पत्रात मुंबई शहराचे अभिनंदन केले आहे. तसेच मुंबई शहर हे आता शहरी आणि सामुदायिक वनीकरणात आघाडीवर असलेल्या महत्त्वाच्या जागतिक ‘नेटवर्क’मध्ये सहभागी झाले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.