महेश मांजरेकरांना अटक होणार? न्यायालयाच्या आदेशाचा होणार का परिणाम?

151

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘नाय वरण-भात लोंचा कोन नाय कोंचा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर व अन्य संबंधित व्यक्तींवर 23 फेब्रुवारी रोजी माहिम पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. पोक्सो विशेष न्यायालयाचा आदेश रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात मांजरेकर व दिग्दर्शक यांनी केलेल्या याचिकेच्या सुनावणी वेळी एफआयआर वाचल्यानंतर उच्च न्यायालयाने आज कोणताही रिलीफ देता येणार नाही असे सांगितले आहे. आरोपींच्या वकिलांनी सोमवार पर्यंत अटक करू नका अशी विनंती केली ती सुद्धा न्यायालयाने फेटाळली. स्त्री शक्ती संघटनेतर्फे आशिष चव्हाण व प्रकाश सालसिंगिकर यांनी बाजू मांडली.

( हेही वाचा : हसीना आणि नवाब यांच्या बैठकीत नक्की काय झाले? वाचा… )

गुन्हा दाखल

सदर चित्रपटामध्ये बालकलाकारांकडून अतिशय टोकाची हिंसा, आक्षेपार्ह दृश्य करुन घेण्यात आली असल्यामुळे अतिशय अर्वाच्य भाषाही त्यांच्या तोंडी आहेत. दरम्यान, बालकलाकारांकडून आक्षेपार्ह चित्रण केल्याबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते व संबंधितांविरोधात कारवाई करण्याकरिता भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या वतीने माहिम पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली होती, त्यानंतर तेथील पोलीस उपायुक्त व पोलीस सह आयुक्तांनी, मुंबई येथे तक्रार दिली होती. मात्र त्यावर कुठलीही कारवाई न झाल्यामुळे सदर प्रकरण स्त्रीशक्ती संस्थेच्या सीमा देशपांडे यांनी प्रकाश सालसिंगिकर यांच्या मार्फत न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाकडून आदेश देण्यात आल्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अत्यंत बिभत्स ट्रेलर व चित्रपट बनवून बालकांचा चुकीचा वापर केल्याने चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर, निर्माते नरेंद्र व श्रेयस हिरावत, सहनिर्माता विजय शिंदे व अन्य संबंधितांनी केवळ अर्थाजर्नाच्या उद्देशाने हा चित्रपट तयार केला असल्याचे एफआयआरमध्ये नमूद केले आहे.

अटक होणार का?

‘नाय वरण-भात लोंचा कोन नाय कोंचा’ या चित्रपटात १३ ते १५ वर्षे वयोगटातील अल्पवयीन मुलांना लैंगिक संबंधांमध्ये गुंतलेले, टोकाची हिंसा करतांना, अर्वाच्य शिव्या व अश्लील भाषेचा वापर करताना आणि जवळच्या महिला नातेवाईकांबरोबर अनैतिक संबंध ठेवताना दाखवले असल्याचे भारतीय स्त्री शक्ती संघटनेने सादर केलेल्या तक्रारपत्रात म्हटले आहे. तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की, या चित्रपटाच्या माध्यमातून मुंबईतील गिरणी कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील स्त्रीयांचे अतिशय विकृत चित्रीकरण करण्यात आले आहे. या चित्रपटात भारताच्या पोक्सो (POCSO) सहीत अन्य कायद्यांचे उल्लंघन झाले आहे. येत्या काळात पोलीस तपासात काय समोर येते, या सगळ्यांना अटक होते का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.