मेहतांनंतर आता कुंटे हटाव मोहीम, मुख्यमंत्र्यांबद्दलही राष्ट्रवादीची नाराजी!

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध वाढत चालला आहे. नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत त्याचा सूर उमटला.

86

राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून या ना त्या कारणामुळे चर्चेत असून, आता काँग्रेस नंतर राष्ट्रवादीची नाराजी देखील समोर आली आहे. आता अजोय मेहता यांच्यानंतर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हे महाविकास आघाडीच्या रडारवर आले आहेत. राष्ट्रवादीला आता सीताराम कुंटे हे देखील नकोसे झाले आहेत. त्याचमुळे आता कुंटे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने दंड थोपटले आहेत.

…म्हणून नकोत राष्ट्रवादीला  कुंटे

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध वाढत चालला आहे. नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत त्याचा सूर उमटला. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी खुद्द कुंटे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. सीताराम कुंटे यांना हटवून प्रवीण परदेशी यांना मुख्य सचिव करावे, अशी मागणी देखील होऊ लागली आहे. रेमडेसिवीर खरेदीबाबत तात्काळ मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती नेमावी आणि त्यांनी तात्काळ खरेदीबाबत बैठका आणि उपाययोजना कराव्यात, अशा सूचना कॅबिनेटमध्ये देण्यात आल्या होत्या. या उपाययोजना २१ एप्रिलपासून सुरू कराव्यात अशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना मंत्रिमंडळाने केल्या. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा कॅबिनेटचा निर्णय झालेला असताना, परस्पर अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमल्याने 28 एप्रिलच्या बैठकीत जयंत पाटील नाराज झाले होते.

(हेही वाचाः ठाकरे सरकारला वाटतेय अधिकाऱ्यांची भीती?)

मुख्यमंत्र्यांवरही राष्ट्रवादी नाराज

विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील राष्ट्रवादीचे मंत्री नाराज आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिकाऱ्यांना हाताशी धरुन, राष्ट्रवादीला लक्ष करत असल्याचा सूर राष्ट्रवादीच्या गोटात उमटत आहे. खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची तक्रार केल्याचे समजते.

याआधी अजोय मेहतांवरुन घमासान

अजोय मेहता मुख्य सचिव असताना त्यांच्यावर देखील महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्री नाराज होते.काँग्रेसचे तीन, तर राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपली खदखद व्यक्त करत मेहतांची उचलबांगडी करण्याची मागणी केली होती.

(हेही वाचाः मुख्यमंत्री अजूनही मेहतांवर ‘मेहरबान’?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.