NDRF आणि SDRF तैनात! अतिवृष्टीत मदत कार्यासाठी यंत्रणांना सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

93

राज्यात कोकणासह काही भागात सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत. पूर परिस्थितीवर उपाययोजना म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (NDRF) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (SDRF) ११ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच बेस स्टेशनवर एनडीआरएफच्या ९ आणि एसडीआरएफच्या ४ अशा एकूण १३ टीम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

( हेही वाचा : कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी; परशुराम घाट आठ दिवस बंद)

NDRF आणि SDRF टीम सज्ज

राज्यात संपूर्ण कोकणासह अमरावती विभागातील काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच काही ठिकाणी नदीच्या पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक पातळीवर उपाय योजना करण्यात येत आहेत. तसेच आवश्यक असणाऱ्या ठिकाणी राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत कोकण विभागातील पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १०० मिमी. पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असून हवामान विभागाकडून अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत गेल्या २४ तासात कुलाबा येथे ११७ मिमी तर सांताक्रूझ येथे १२४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद

रत्नागिरी जिल्ह्यात सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही मात्र जिल्ह्यातील २ नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली असून जिल्हा प्रशासन सतर्क आहे. तसेच वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या घाटातील वाहतूक अन्य मार्गाने वळण्यात आली आहे.

( हेही वाचा : मोबाईल अ‍ॅपद्वारे करता येणार रिक्षा-टॅक्सी चालकांच्या तक्रारी; मनमानी कारभाराला चाप)

स्थानिक बचाव पथके कार्यरत

पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यात सद्यस्थितीत पूर परिस्थिती निर्माण झालेली नाही, मात्र नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील चांदूरबाजार आणि मोर्शी येथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून गावातील लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे काम सुरु असून, सद्यस्थितीत जिल्ह्यात स्थानिक बचाव पथके कार्यरत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.