राजभवनातील ‘ते’ भुयार क्रांतिकारकांच्या आठवणींना देणार उजाळा!

124

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवार, १४ जून रोजी मुंबईमधील जल भूषण इमारत आणि राजभवन येथील क्रांतिकारक गॅलरीचे उद्घाटन करणार आहेत. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत असंख्य ज्ञात-अज्ञात क्रांतीकारकांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता. त्यांच्या स्मरणार्थ राजभवनात गॅलरी तयार करण्यात आली. त्यामुळे ही गॅलरी मुंबईसह देशवासियांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. विशेष म्हणजे या कांतिकारकांच्या गॅलरीचे निर्माण करण्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचेही योगदान आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने पुरवली माहिती 

सन 2016 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांना राजभवनामध्ये एक भुयार सापडले होते. शस्त्रास्त्र ठेवण्यासाठी गुप्त ठिकाण म्हणून पूर्वी ब्रिटीश या भुयाराचा उपयोग करत होते. 2019 साली या भुयाराचे नुतनीकरण करण्यात आले. त्यानंतर या भुयारात गॅलरी बांधण्यात यावी, त्यामध्ये महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारकांची माहिती देणारे संग्रहालय उभारण्यात यावे, अशी संकल्पना राजभवनाने मांडली. त्यानुसार हे संग्रहालय उभारण्यात आले आहे. या संग्रहालयात सावरकर बंधू, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, मॅडम भिकाजी कामा, व्ही.बी. गोगटे यांच्याविषयी तसेच 1946 मधील नौदल क्रांती याविषयी माहिती मिळणार आहे. जेव्हा या संग्रहालयाची निर्मिती करण्याची संकल्पना राजभवनाने मांडली, त्यासाठी क्रांतिकारकांविषयी माहिती उपलब्ध करून देण्याचे योगदान स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने दिले.

(हेही वाचा ‘झुकेगा नही…’ म्हणणारा काँग्रेसचा नेता पोलिसांना घाबरून पळाला )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.