स्टिंग ऑपरेशनमधून धक्कादायक खुलासे! मोदींच्या सुरक्षेबाबत काय आलं समोर

79

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेबाबत उपस्थित करण्यात येत असलेल्या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळताना दिसत आहे. याबाबतची माहिती मिळत असतानाच या प्रकरणातील एक मोठा खुलासा समोर आला आहे. या नव्या माहितीत पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत पंजाबमधील पोलीस आणि काँग्रेस सरकारची वागणूक कशी होती हे सांगण्यात आले आहे. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी याप्रकरणी पोलीस प्रशासनाला निष्कलंक म्हणत कारवाई करण्यास नकार दिला असताना, खुद्द पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे वेगळेच असल्याचे स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले आहे.

5 जानेवारी रोजी फिरोजपूरमधील कथित सुरक्षा त्रुटीची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सध्या चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या रॅलीच्या काही वेळ आधी आंदोलकांनी रास्ता रोको केल्याची माहिती पंजाब पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाल्याचे इंडिया टुडेच्या स्टिंग ऑपरेशनमधून उघड झाले आहे.

धक्कादायक माहिती स्टिंगमधून उघड

या स्टिंग ऑपरेशनमध्ये सीआयडीचे डीएसपी सुखदेव सिंग यांनी असे सांगितले की, त्यांनी 2 जानेवारी रोजी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना माहिती दिली होती की, फिरोजपूरसह मख्खू, हिरेक, फाजिल्का आणि मोगा आदी भागातील भारतीय किसान युनियन क्रांतिकारी फूल समूहाचे शेतकरी पंतप्रधानांच्या रॅलीला कडाडून विरोध करू शकतात. 2 जानेवारीलाच या संदर्भात पत्र पाठवून काही महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक बंद करण्यात यावी आणि भाजप कार्यकर्त्यांना पीएम मोदींच्या रॅलीपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली होती.

ते असेही म्हणाले की, आंदोलक रॅलीमध्ये घुसू शकतात आणि पोलिसांनी त्यांना अडवल्यावर रस्त्यावर धरणे आणि नाकाबंदी करण्याचा इशारा देत अनेक अहवाल वरिष्ठ अधिकार्‍यांना पाठवण्यात आले.भारतीय किसान युनियन रिव्होल्युशनरीने आधीच गर्दी जमवण्याचा कट रचला होता. त्यांनी मोर्चा काढून रस्ता अडवला. यानंतर पुन्हा पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांनी सांगितले की 2, 3, 4 जानेवारी रोजी एडीजी (सुरक्षा) नागेश्वर राव देखील आले होते, त्यांना नाकाबंदीबाबत चेतावणी देणारे पत्र देण्यात आले होते. मोदी याआधी हेलिकॉप्टरने फिरोजपूरला जाणार होते, मात्र खराब हवामानामुळे त्यांना कारने प्रवासाची योजना आखावी लागली.

एसएसपींनी फिरोजपूर पोलिसांनाही सांगितले की, शेतकरी फिरोजपूरचा नाकाबंदी तोडून पुढे सरसावले आहेत. पंतप्रधानांचा ताफा ज्या मार्गावरून जाणार होता तो मार्ग शेतकऱ्यांनी अडवला असल्याचेही त्यांना स्पष्ट करण्यात आले. दुसरीकडे, त्यादिवशी रास्ता रोको करणारे आंदोलक शेतकऱ्यांच्या वेशात कट्टरवादी लोकं असल्याचा दावा त्यांनी केला. प्रोटोकॉलचे उल्लंघन करून उड्डाणपुलाजवळील बाजारपेठही उघडी ठेवण्यात आली होती, ज्यामध्ये दारूचे दुकानही खुलेआम सुरू होते. आंदोलकांनी ग्रामस्थांना रास्ता रोको करण्यासही चिथावणी दिली. लाठ्या-काठ्या घेऊन धावणारे तरुण गावकऱ्यांना गोळा करत होते. अनेक शेतकरी संघटना तेथे कार्यरत होत्या. एका गावकऱ्याने सांगितले की, गुरुद्वाराला संदेश पाठवण्यात आला होता की लोकांनी एकत्र यावे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.