गोदावरी, प्राणहिता पाणलोट क्षेत्रात नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

96

गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये सरासरी २० मिमी पाऊस झाला असून, वैनगंगा, प्राणहिता व वर्धा या नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत. गोदावरी नदी व इंद्रावती नदी धोका पातळीच्या वर वाहत आहे. या नद्या तुडुंब भरल्याने अनेक मार्ग खंडित झाले असून, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सध्या १० हजार ६०६ जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून, त्यांच्यासाठी ३५ मदत केंद्रे उघडण्यात आली आहेत.

(हेही वाचा – संसद संवादाचे सक्षम माध्यम, जिथे वादविवाद, विश्लेषण, चर्चा होणे आवश्यक – पंतप्रधान मोदी)

कालेश्वरम सरिता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी महत्तम पूर पातळीवरून वाहत आहे. लक्ष्मी बॅरेजचे (मेडीगड्डा) ८५ पैकी ८५ दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. तरी नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

परशुराम घाटात एकेरी वाहतूक

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २०.१ मिमी पावसाची नोंद झाली असून, सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही. मात्र खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळी वरून वाहत आहेत. वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातून ३० जुलै २०२२ पर्यंत सकाळी ६ वा. पासून ते सायंकाळी ७. वा. पर्यंत अवजड वाहनाची एकेरी वाहतूक सुरू राहील. सायंकाळी ७. वा. ते सकाळी ६ वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तसेच राजापूर कोल्हापूर यांना जोडणारा अनुस्कुरा घाटातील दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

राज्यात ७३ तात्पुरती निवारा केंद्र तयार

राज्यात ७३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली असून, आतापर्यंत ११ हजार ८३६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आतापर्यंत अति वृष्टीमुळे १०४ नगरिकांनी जीव गमावला आहे, तर १८९ प्राणी दगावले आहेत. राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.