सावरकरांनी सांगितलेला हिंदू धर्म हाच खरा माणूसधर्म

हिंदू धर्म कुठलेही नियम काटेकोरपणे पाळायला सांगत नाही, इतक्या सोप्या भाषेत सावरकरांनी हिंदुत्व समजावून सांगितले आहे.

166

हिंदू असणं म्हणजेच सेक्युलर असणं. कारण जगात हिंदू हा एकच धर्म आहे, बाकीच्या धर्मसंस्था आहेत. हिंदू धर्म हा माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारा खरा माणूसधर्म आहे, असे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार होते. अशा शब्दांत अभिनेते आणि प्रखर सावरकरवादी वक्ते शरद पोंक्षे यांनी सावरकरांचे हिंदुत्व पटवून दिले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादर येथे संस्कार भारती, कोकण प्रांततर्फे अभिनेते आणि स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक शरद पोंक्षे यांचे व्याख्यान शनिवारी आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

हिंदुत्व कट्टरतावादी नाही

ज्याला गुणधर्म असतात तो खरा धर्म. हिंदू धर्म हा माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवतो. त्यामुळे जगात केवळ आणि केवळ हिंदू हा एकच धर्म आहे. बाकीच्या धर्मसंस्था आहेत. संस्था या सामाजिक आणि भौगोलिक गरजेतून निर्माण होतात. त्यामुळे त्यांना त्या धर्मसंस्थांचे विशिष्ट असे नियम लागू असतात. या नियमांचे काटेकोर पालन जो करतो, त्यालाच त्या धर्मसंस्थेत जागा मिळते. हा त्या धर्मसंस्थेचा कट्टरतावाद आहे. पण हिंदुत्व हे कधीच कट्टरतावादी नसतं तर ते प्रखर असतं. हिंदू धर्म कुठलेही नियम काटेकोरपणे पाळायला सांगत नाही, इतक्या सोप्या भाषेत सावरकरांनी हिंदुत्व समजावून सांगितले आहे, असे पोंक्षे म्हणाले.

(हेही वाचाः बाळासाहेबांचा ‘हा’ नारा आता ऐकू येणार नाही! शरद पोंक्षेंना वाटते भीती)

सावरकरांनी हुंदुत्वाशी तडजोड केली नाही

सावरकर हे प्रखर हिंदुत्ववादी होते. त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधीच हिंदुत्वाशी तडजोड केली नाही. संपूर्ण हिंदुस्थान माझ्या विरुद्ध गेला तरी मी कायम हिंदुत्वाच्या हिताचेच बोलत राहीन, हीच सावरकरांची भूमिका कायम होती. त्यामुळेच त्यांना लक्ष्य केलं जातं. त्यांच्या याच निष्ठेमुळे इंग्रजांना त्यांची कायम भीती होती. असे शरद पोंक्षे आपल्या व्याख्यानात म्हणाले.

बहुसंख्यांकांना डावलून राष्ट्राचे हीत साधणार नाही

जगाच्या पाठीवरचा कुठलाही देश हा बहुसंख्यांकांच्या दृष्टीने धोरणं ठरवत असतो. बहुसंख्यांच्या हिताशिवाय देशाचे हीत कधीच होऊ शकत नाही. निधर्मी राष्ट्र हा हा संकल्पनाच सावरकरांना कधी मान्य नव्हती. जर निधर्मी राष्ट्र असतं तर आज आपल्याकडे आरक्षणासाठी मोर्चे निघाले नसते, असे परखड मत शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.

अहिंसेच्या रक्षणासाठी शस्त्रं हातात घेणं हाच खरा धर्म

अहिंसा हा श्रेष्ठ धर्म आहे असं आपल्या संस्कृतीत सांगितलं आहे. पण जी व्यक्ती तो धर्म नष्ट करू पाहते ती व्यक्ती अधर्मी आहे आणि अधर्माचा नाश करणं हेच खरं धर्मरक्षण आहे असं भगवद्गीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहे. अहिंसा हा अनैसर्गिक शब्द आहे, असे सावरकरांचे विचार होते.

(हेही वाचाः केंद्र सरकार घसरतंय… शरद पवारांचं मोठं विधान!)

भगवद्गीतेची जयंती साजरी करा

आपण प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्णा वाचले तर आपल्यात आमूलाग्र बदल होतील, अशी शिकवण आपल्याला सावरकरांनी दिली आहे. पण आपण फक्त श्रीकृष्णाची दहीहंडीच उचलली. त्यावर लाखोंच्या बक्षिसांची उधळण केली. त्यापेक्षा भगवद्गीतेची जयंती साजरी करुन गीतेतील श्लोक अर्थासहित मुखोद्गत असणा-यांना बक्षिसं देणं गरजेचं आहे, असे म्हणत पोंक्षेंनी राजकीय हंड्यांवर निशाणा साधला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.