कृष्ण जन्मभूमी वाद: शाही ईदगाह हटवण्याची याचिका न्यायालयात मंजूर

105

वाराणसीतील ज्ञानवापीनंतर आता कृष्णजन्मभूमी-शाही ईदगाह मशिदीवर न्यायालयीन सुनावणी होणार आहे. मथुरा न्यायालयाने यासंबंधीची याचिका सुनावणीसाठी स्वीकारली आहे. शाही ईदगाह मशीद ही कृष्णजन्मभूमीवर बांधलेली आहे, त्यामुळे ती हटवण्यात यावी, असे याचिकेत म्हटले होते. त्यामुळे मथुरेतील कृष्ण जन्मभूमी आणि शाही इदगाह मशीद वादावरही न्यायालयात सुनावणी होणार असून, मथुरा जिल्हा न्यायालयाने या प्रकरणी खटला चालवण्यास परवानगी दिली आहे. दिवाणी न्यायाधीशांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर जिल्हा न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

(हेही वाचा – Gyanvapi Mosque Case: ज्ञानवापी मशिदीची सुनावणी लांबणीवर, न्यायालयाकडे निर्णय राखीव)

यापूर्वी दिवाणी न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. त्यानंतर हिंदू पक्षाने मथुरा न्यायालयात याचिका दाखल केली. आता ही याचिका स्वीकारत मथुरा न्यायालयाने त्यावर दिवाणी न्यायालयाने सुनावणी करावी, असे म्हटले आहे. मथुरा न्यायालयाने श्री कृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाहशी संबंधित याचिका कायम ठेवण्यायोग्य मानली असून जिल्हा व सत्र न्यायाधीश राजीव भारती यांनी हा निर्णय दिला आहे.

ईदगाहच्या जागेचा मालकी हक्क मिळण्याचा दावा

मथुरा जिल्हा न्यायालयात कृष्ण जन्मभूमी ईदगाह मशीद वादाची सुनावणी 6 मे रोजी पूर्ण झाली होता. त्यामध्ये सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता. या प्रकरणात वकील रंजना अग्निहोत्री यांच्यासह 6 याचिकाकर्ते आहेत. ही याचिका 2020 मध्ये दाखल करण्यात आली होते, ज्यामध्ये शाही ईदगाहच्या जागेचा मालकी हक्क मिळण्याचा दावा करण्यात आला होता.

काय आहे मथुरेचा वाद

सर्वोच्च न्यायालयातील वकील हरिशंकर जैन, विष्णू शंकर जैन, रंजना अग्निहोत्री यांनी दाखल केलेल्या दाव्यानुसार, 13.37 एकर जमिनीच्या मालकीवरून वाद सुरू आहे. यामध्ये 10.9 एकर जमीन श्री कृष्ण जन्मस्थानजवळ आणि 2.5 एकर जमीन शाही ईदगाह मशिदीजवळ आहे.

काशी आणि मथुरेचा वादही काहीसा अयोध्येसारखाच आहे. काशी आणि मथुरा येथे औरंगजेबाने मंदिर पाडून तेथे मशीद बांधल्याचा हिंदूंचा दावा आहे. औरंगजेबाने 1669 मध्ये काशीतील विश्वनाथ मंदिर पाडले आणि 1670 मध्ये मथुरेतील भगवे केशवदेव मंदिर पाडण्याचा हुकूम जारी केला. यानंतर काशीतील ज्ञानवापी मशीद आणि मथुरेतील शाही ईदगाह मशीद बांधण्यात आली. मथुरेत या वादाची चर्चा गेल्या वर्षी सुरू झाली जेव्हा अखिल भारतीय हिंदू महासभेने ईदगाह मशिदीत भगवान कृष्णाची मूर्ती बसवण्याची आणि जलाभिषेक करण्याची घोषणा केली होती. मात्र, हिंदू महासभेला तसे करता आले नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.