दिवा ते रत्नागिरी पॅसेंजर ‘या’ तारखेपासून होणार अधिक वेगवान

206

कोकण रेल्वे मार्गावरील मुंबईतून रत्नागिरीपर्यंत जाणारी दिवा ते रत्नागिरी ही पॅसेंजर रेल्वे १५ मार्चपासून अधिक वेगवान होणार आहे. कोकण रेल्वेने गाडीचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. अजून ही पॅसेंजर रेल्वे दादर येथून चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतलेला नाही. काही दिवसांपूर्वी मुंबईत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कोकणावासीयांच्या मागणीनुसार ही गाडी दादरपर्यंत नेण्याची सूचना मध्य तसेच कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना केली होती, मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

( हेही वाचा: कांदिवलीच्या समतानगरमध्ये प्रेमी युगुलाची आत्महत्या ‘एकदुजे के लिए’ )

कोकण रेल्वेकडून बदलण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, दिवा ते रत्नागिरी मार्गावर धावणारी गाडी दिवा येथून संध्याकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी सुटून रत्नागिरीला ती रात्री १२ वाजून ३५ मिनिटांनी पोचणार आहे. पूर्वी ती गाडी रात्री २ वाजता पोहचत होती. रत्नागिरी येथून सकाळी सुटलेली गाडी दिव्याला दुपारी १.२५ वाजता पोचते. ती परतीच्या फेरीत सायंकाळी ५.५० ला सुटणार आहे. यामध्ये ४ तास २५ मिनिटे गाडी दिवा येथे थांबूनच राहते. एवढ्या वेळात गाडी पूर्वीप्रमाणे दादरला सहज जाऊ शकणार आहे. मात्र यावर अंमलबजावणी कधी होते, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. कोरोनापश्चात या गाडीचे काही थांबे वगळण्यात आले आहेत. दिवा ते रत्नागिरी या प्रवासासाठी तब्बल नऊ तास १५ मिनिटे लागत होती. आता सुधारित वेळापत्रकामुळे ही गाडी सहा तास ४५ मिनिटांत रत्नागिरीत पोहचणार आहे. यामुळे दिवा-रत्नागिरी पॅसेंजर प्रवास वेळेत तब्बल अडीच तासांची बचत करून फास्ट पॅसेंजरप्रमाणे धावणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.