अतिक्रमण निर्मूलन विभागालाच महापालिका बनवते कमजोर

95

मुंबईतील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतरही महापालिकेने अतिक्रमण निर्मूलन विभागाला सक्षम करण्याऐवजी हा विभागच आता कमजोर करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. या विभागाचे पूर्णवेळ असलेल्या उपायुक्तांची बदली करतानाच सहायक आयुक्तांचीही बदली करत या विभागाला कार्यक्षम बनवण्याचा प्रयत्न केला. एका बाजुला महापालिकेच्यावतीने काही नेत्यांच्या घरांमधील अनधिकृत बांधकामांचा शोध घेताना दुसरीकडे अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे हा विभाग सक्षम बनवण्याऐवजी त्या विभागाचे महत्वच कमी करून अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आयुक्तांनी या विभागाचे महत्वच कमी करुन टाकले

मुंबईत मागील काही वर्षांपासन अनधिकृत बांधकामांच्या संख्येमध्ये वाढ झालेली असून खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महापालिका आयुक्तांना सूचना करत ही अनधिकृत बांधकामे तोडण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु त्यानंतरही महापालिका आयुक्तांकडून कोणत्याही प्रकारे कार्यवाही केली गेली नाही. या अनधिकृत बांधकांमांसह फेरीवाल्यांवरील कारवाई करणाऱ्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचा भार पूर्वी उपायुक्त (विशेष) यांच्यासह शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांसह प्रत्येकी एका सहायक आयुक्तांऐवजी केवळ एकमेव मधुकर मगर या सहायक आयुक्तांकडे सर्वांचा भार होता.

परंतु मागील काही महिन्यांपासून चंदा जाधव यांना उपायुक्तपदी बढती मिळाल्यानंतर त्यांच्याकडे अतिक्रमण निर्मूलन विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर टि विभागाचे सहायक आयुक्त असलेल्या किशोर गांधी यांच्यावरही अतिक्रमण निर्मूलन विभाग(पूर्व व पश्चिम उपनगर) यांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यामुळे उपायुक्त चंदा जाधव यांच्या नेतृत्वाखाली किशोर गांधी व अनंत भागवतकर यांची टिम काम करत असतानाच पुन्हा आयुक्तांनी या विभागाचे महत्वच कमी करुन टाकले आहे.

( हेही वाचा : आता सोनोग्राफी केंद्रांची नोंदणी ऑनलाईन होणार )

अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त चंदा जाधव यांची बदली परिमंडळ १ पदी केली असून या विभागाचे पूर्व व पश्चिम उपनगराची जबाबदारी सांभाळणाऱ्या सहायक आयुक्त किशोर गांधी यांना उपायुक्तपदी बढती देत त्यांच्यावर महापालिका उपायुक्त(उद्याने) या विभागाचा भार सोपवला आहे.

तर अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपायुक्त पदाचा भार उपायुक्त(विशेष) यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे उपायुक्त (विशेष) यांच्याकडे अतिक्रमण निर्मूलन विभाग सोपवून त्यांच्या अखत्यारित केवळ एकमेव अनंत भागवतकर हे अधिकारी हाताशी दिले आहेत. भागवतकर यांच्याकडेही या सहायक आयुक्त पदाचा अतिरिक्त कारभार असल्याने ते संपूर्ण मुंबईतील अनधिकृत बांधकामांकडे लक्ष वेधणार कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबईत अनधिकृत बांधकामे तसेच फेरीवाल्यांच्या समस्या वाढत असताना त्यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक असल्याने हा विभाग अधिक सक्षम बनवणे गरजेचे आहे. परंतु महापालिका आयुक्तांनी या विभागाकडे दुर्लक्ष करत मुंबईत बिनधास्त अनधिकृत बांधकामे करा असाच काही प्रयत्न असल्याचे दाखवून दिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.