ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे साकारतेय देशातील सर्वात मोठे मियावाकी स्वरुपाचे शहरी जंगल

89

पर्यावरणशील शहर निर्मितीकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने विविध उपक्रम हाती घेतले असून त्यामधील महत्वाचा भाग असलेल्या वृक्षारोपण व संवर्धनाकडे विशेष लक्ष दिले जात आहे. मागील दोन वर्षात 2 लक्ष 22 हजार वृक्षरोपांची लागवड करण्यात आलेली आहे. सदर वृक्षारोपणाचा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बारकाईने आढावा घेत आगामी एक महिन्याच्या पावसाळापूर्व कालावधीत मियावाकी पध्दतीने नियोजित 60 हजार वृक्षरोपांची लागवड पूर्ण करावी तसेच या वर्षात इतर 20 हजार वृक्षरोपांची लागवडही नियोजनबध्द रितीने व्यवस्थितरित्या पूर्ण करावी, असे निर्देश उद्यान विभागाला दिले.

20 हजाराहून अधिक वृक्षलागवड

सन 2021 वर्षात शहरात 1 लाखाहून अधिक वृक्षरोपांची लागवड करण्यात आली आहे. त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने, ‘ग्रीन यात्रा’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सेक्टर 14, कोपरखैरणे येथील निसर्गोद्यानातील 40 हजार वृक्षांचे मियावाकी पध्दतीचे अतिशय समृध्द शहरी जंगल सीएसआर निधीतून निर्माण करण्यात आले आहे. याशिवाय मोरबे धरण प्रकल्पस्थळी आधीच्या 1 लक्ष वृक्षरोपांमध्ये 40 हजार वृक्षरोपांची भर घालण्यात आलेली आहे. याव्यतिरिक्त शहरात इतर ठिकाणी 20 हजाराहून अधिक वृक्षलागवड करण्यात आली आहे.

मे महिन्यात वृक्षलागवड पूर्ण  करण्याचे उद्धिष्ट

सन 2022 वर्षामध्येही हाच वेग कायम राखत शहरात 7 ठिकाणी 1 लाख 4 हजारपेक्षा अधिक वृक्षरोपांची मियावाकी पध्दतीने लागवड करण्यात आली असून, यामध्ये निसर्गोद्यानातील मियावाकी शहरी जंगलात आधीच्या 40 हजार वृक्षरोपांत आणखी 20 हजार देशी प्रजातींच्या वृक्षरोपांची भर घालण्यात आली आहे. तसेच विविध ठिकाणी 30 हजार वृक्षरोपांची लागवड करण्यात आली आहे. मोरबे धरण प्रकल्पस्थळीही 40 हजार वृक्षरोपांची लागवड करण्यात आली आहे. मियावाकी पध्दतीची वृक्षलागवड ही पावसाळा व्यतिरिक्त कालावधीत करावी लागते, ही बाब लक्षात घेऊन नियोजित केलेली ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे अधिक 48 हजार वृक्ष लागवड तसेच नागा गणा पाटील उद्यान, सेक्टर 15, सीबीडी, बेलापूर येथे 8 हजार वृक्ष लागवड अशी उर्वरित 56 हजार मियावाकी पध्दतीची वृक्षलागवड पावसाळ्यापूर्वी मे महिन्यातच पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

( हेही वाचा: मुंबईत राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचे स्मारक आणि कोल्हापूर भवन उभारणार )

या वृक्षांची लागवड केली जाणार

मियावाकी पध्दतीने लावण्यात येणारी सर्व वृक्षरोपे देशी प्रजातींची असून त्यामध्ये करवंद, कढीपत्ता, तगर, अडुळसा, निंब, खैर, बेल, लिंब, कांचन, आपटा, उंबर, खैर, अशोक, बदाम, बोर, अंजन, बहावा, कोकम, जांभूळ, मोह, बकुळ, करंज, रिठे, काजू, चिंच, आवळा, वड, पिंपळ, सोनचाफा, आंबा, कदंब, साग, सरस अशा 60 हून अधिक देशी वृक्ष प्रजातींचा समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.