‘या’ मुंबई पोलीस आयुक्तांची कारकीर्द ठरलेली वादग्रस्त!

अंबानी प्रकरणी सरकार आणि प्रशासन स्तरावरील अनेक मोठी नावे समोर येत आहेत. सरकारने यात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी केली. मात्र मुंबई आयुक्तांवर कारवाई झाल्याचे हे पहिलेच प्रकरण नाही. 

105

मुंबई पोलीस आयुक्त हे पद मानाचे पद म्हणून मानले जाते, या पदावर विराजमान होण्यासाठी जेष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये नेहमी रस्सीखेच होत असते. राज्याच्या पोलीस महासंचालकाच्या पदाला जेवढे महत्व नाही, तेवढे महत्व मुंबई पोलीस आयुक्त या पदाला आहे. शासनाने मुंबई पोलीस आयुक्त पदाला पोलीस महासंचालकाचा दर्जा दिला आहे. मुंबई पोलीस आयुक्त पद भूषवणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यांना एका प्रकारचा मानसन्मान असतो. या पदावर विराजमान झालेले अनेक अधिकारी वादाच्या भोवऱ्यात देखील अडकलेले आहे.

प्रथमच मुंबई पोलीस आयुक्ताला झालेली अटक!  

२००३ साली झालेल्या स्टॅम्प घोटाळा प्रकरणी मुंबई पोलीस दलातील अनेक जेष्ठ अधिकारी वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्या वेळचे तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त आर.एस. शर्मा यांना या पदावरून पायउतार व्हावे लागले, तसेच या घोटाळ्यात रणजित शर्मा  यांना अटक करण्यात आली होती.

शीना बोरा प्रकरण राकेश मारियांना भोवले!

२०१४ ते २०१५ या कालावधीत मुंबई पोलीस आयुक्त म्हणून रुजू झालेले राकेश मारिया हे शीना बोरा हत्या प्रकरणात वादाच्या भोवाऱ्यात अडकले होते. त्यांना देखील या पदावरून पायउतार व्हावे  लागले होते. त्याची आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती व त्यांना गृहरक्षक (होमगार्ड) येथे बदली करण्यात आली होती.

(हेही वाचा : सचिन वाझेसाठी ते चार तास कठीण… काय झाले त्या चार तासांत?)

अंबानी प्रकरणात परमबीर सिंग यांची उचलबांगडी!

त्यानंतर थेट मुंबई पोलीस आयुक्त पदावर असलेले परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणात मुंबई पोलीस दलाचे सीआययुचे तत्कालीन प्रभारी सचिन वाझे यांना एनआयएच्या पथकाने अटक केल्यानंतर मुंबईत पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर आरोप होऊ लागल्यामुळे शासनाने परमबीर सिंग यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवून त्यांची बदली गृह रक्षक दलाचे प्रमुख पदावर करण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील इतिहासात प्रथमच पोलीस महासंचालक पदावरील अधिकाऱ्याला मुंबई पोलीस आयुक्तपदी बसवण्यात आले आहे, हेमंत नगराळे यांच्याकडे काही महिन्यापूर्वीच राज्याच्या पोलीस दलाची धुरा तात्पुरती स्वरूपात देण्यात आली होती व त्यांना या पदावर कायम करण्यात येणार असल्याची चर्चा असताना रिक्त झालेल्या मुंबईत पोलीस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांना बसवण्यात आले आहे व राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे प्रमुख रजनीश सेठ यांना तात्पुरता कार्यभार देण्यात आला आहे.

हेमंत नगराळेही निलंबित झाले होते!

हेमंत नगराळे हे १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत, त्यांनी मुंबई पोलीस दलात अप्पर पोलीस आयुक्त पूर्व उपनगरे म्हणून काम केले असून अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून गुन्हे शाखा आणि प्रशासन म्हणून त्यांनी काम बघितले आहे. २००८ मध्ये नगराळे यांना कौटुंबिक वादाला सामोरे जावे लागले होते. त्यांच्या विरुद्ध त्यांची पत्नी यांनी तक्रार दाखल केली होती. तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्त असताना पोलीस अधिकारी अश्विनी बेंद्रे बेपत्ता प्रकरणातही तक्रार थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेली होती. तसेच एका बांधकाम व्यावसायिकाला पुरवण्यात आलेले संरक्षण नगराळे यांनी काढून घेतल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाने न्यायालयाचे दार ठोठावले होते, त्यावेळी न्यायालयाने नगराळे यांना जाब विचारून त्यांना खडेबोल सुनावले होते. मार्च २०१८ मध्ये हेमंत नगराळे यांचे निलंबन करण्यात आले होते. विधान परिषदेच्या परवानगी शिवाय शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणे नगराळे यांच्या चांगलेच अंगलट आले होते. या प्रकरणाची चर्चा विधान परिषदपर्यंत झाली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.